मुंबई: राज्यातील जनतेसाठी मोठा दिलासा देणारे वृत्त आहे. नव्या कोरोनाबाधितांची संख्येत मोठी घट झाली आहे. राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत तब्बल २५ हजार ६१७ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट ९४.७३ टक्क्यांवर गेला आहे. तर, गेल्या २४ तासांत राज्यांत एकूण १५ हजार २२९ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. (maharashtra reports 15 229 new corona cases and 307 deaths in last 24 hours)
मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यांत १५ हजार २२९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. याच कालावधीत ३०७ कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तसेच २५ हजार ६१७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण ५४ लाख ८६ हजार २०६ रुग्ण बरे झाले आहेत. आताच्या घडीला राज्यातील मृत्यूदर १.६८ टक्के इतका आहे. राज्यातील उपचाराधीन रुग्णांची एकूण २ लाख ०४ हजार ९७४ आहे.
मुंबईत रुग्णदुपटीचा कालाावधी ५०० दिवस
गेल्या सलग काही दिवसांपासून राज्यातील नव्या कोरोनाबाधितांची संख्या २० हजारांच्या खाली राहिल्याचे सांगितले जात आहे. तसेच मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोना संसर्गाची दुसरी लाट वेगाने घसरताना दिसत आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत ९६१ नवीन करोनाबाधितांची भर पडली आहे. तर याच कालावधीत ८९७ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. दिवसभरात मुंबईत २७ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा १४ हजार ९६५ इतका झाला आहे. मुंबईत कोरोनाचे १६ हजार ६१२ उपचाराधीन रुग्ण आहेत. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्के असून, रुग्णवाढीचा दर ०.१३ टक्के इतका आहे. रुग्णदुपटीचा कालाावधी ५०० दिवसांवर गेला आहे.
धारावीमध्ये केवळ एका रुग्णाची नोंद; कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल!
दरम्यान, राज्यात एकूण ३ कोटी ५७ लाख ७४ हजार ६२६ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ५७ लाख ९१ हजार ४१३ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. राज्यात १५ लाख ६६ हजार ४९० जण गृह विलगीकरणात आहेत. तर, ०७ हजार ०५५ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.