Maharashtra Rain Alert: राज्यातील काही भागात पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. पुढील काही दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांत पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाने कोकणातील काही जिल्ह्यांत अतिमुसळधार पाऊस पडेल, अशी शक्यता वर्तवली असून, रेड अलर्ट दिला आहे. मुंबई, ठाण्यासह इतर काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
भारतीय हवामान विभागाने रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यात पुढील २४ तासांत अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. जिल्ह्यातील काही भागात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह अत्यंत मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातही काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडेल. १५ आणि १६ जून रोजी जिल्ह्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सिंधुदुर्गला १६ जून रोजी रेड अलर्ट दिला गेला आहे.
मुंबई-ठाणे, घाट परिसरात अतिमुसळधार पावसाचा अंदाज
१४ आणि १५ जून रोजी मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, पुणे घाट परिसर, सातारा घाट परिसर, कोल्हापूर घाट परिसर या भागात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल. विजांच्या कडकडाटासह ५० ते ६० किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील, असे हवामान विभागाने म्हटले आहे.
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे घाट परिसर, सातारा घाट परिसर, कोल्हापूर घाट परिसर या भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
वाचा >>आषाढी वारीसाठी निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला सरकारकडून आर्थिक अनुदान जाहीर
महाराष्ट्राच्या उर्वरित भागात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.