शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंड पुकारण्याआधी दोन दिवस त्यांच्याशी चर्चा केली होती. त्यावेळी शिंदेंनी त्यांना सोबत येण्याची ऑफर दिली होती, असे राऊतांनी म्हटले. सोहित मिश्रा यांना दिलेल्या मुलाखतीत संजय राऊतांनी असे सांगितले .
संजय राऊत म्हणाले की, "शिंदेंनी मला ऑफर दिली होती की, येथे काय आहे? तुम्ही आमच्यासोबत या, तुमच्यासारखा नेता आमच्यासोबत राहिला तर आपण २५ वर्षे राज्य करू. पण मी ऑफर नाकारली. मी आज जे काही आहे ते माझ्या पक्षामुळेच आहे. पक्ष अडचणीत असताना मी पळून जाऊ शकत नाही. मी पळपुटा नाही. यापुढे कधी माझ्याबद्दल बोलले जाईल, तेव्हा लोक मला भित्रा किंवा पळपुटा म्हणून शकत नाहीत.'
पुढे म्हणाले की, 'मी त्यावेळी एकनाथ शिंदे यांनाही रोखले. बाळासाहेबांच्या पक्षाने आम्हाला सगळे दिले. त्या कुटुंबाशी माझे नाते आहे. संकटाच्या काळातही आपण त्यांच्यासोबत उभे राहिले पाहिजे. मी शिंदेंसोबत गेलो असतो तर माझ्यापाठी अनेकजण आले असते. पक्षाचे नुकसान झाले असते. आमच्या आईने आम्हाला शिकवले आहे की, चुकत नसाल तर कोणालाही घाबरण्याचे गरज नाही. आमचा पक्ष एक चळवळ आहे. या सर्व गोष्टी चळवळीत घडतात. तरुंगात जावे लागते, न्यायालयीन खटले लढावे लागतात, गुन्हे दाखल होतात, हल्ले होतात, तुम्हाला हे सगळे सहन करावे लागते.'
'नरकतला स्वर्ग' या पुस्तकाबद्दल बोलताना राऊत म्हणाले की 'मला कोणीतरी विचारले की नरक म्हणजे काय? मी म्हणालो की ज्या दिवशी तुम्ही तुरुंगात पाऊल ठेवता, त्या दिवशी नरक सुरू होतो. तुमचा संपूर्ण जगाशी संपर्क तुटतो. तुम्हाला मोठ्या दगडी भिंती दिसतात आणि दुसरे काहीही दिसत नाही. असे एक जग आहे जिथे तुमची ओळख नाही.'