Maharashtra Politics ( Marathi News ) : महाराष्ट्र विधासभा निवडणूक प्रक्रियेवर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी प्रश्न उपस्थित केले. गांधी यांनी या आधीही या निवडणुकीवर संशय व्यक्त केला होता. राहुल गांधी यांच्या या विधानानंतर आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल ( शनिवारी ७ जून) रोजी गांधी यांना प्रत्युत्तर दिले. "महाराष्ट्राच्या जनतेचा, आमच्या लाडक्या बहिणींचा अपमान राहुल गांधी करत आहेत. त्यांनी जागे झाले पाहिजे", असं फडणवीस म्हणाले. दरम्यान, आता काँग्रेस आमदार नाना पटोल यांनी भाजपावर गंभीर आरोप केले आहेत.
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
आज पत्रकार परिषदेत बोलताना नाना पटोले म्हणाले, राहुल गांधी यांचे लेख माध्यमात प्रसिद्ध झाले. यामध्ये त्यांनी महाराष्ट्रात मॅच फिक्सिंग झाल्याचे म्हटले होते. याचे उत्तर निवडणूक आयोगाने द्यायचे होते. पण, भाजपाचेच अंधभक्त ज्यांनी लोकशाहीचा घात केला. लोकशाहीचा खून केला. ज्यांनी जनतेशी बेईमानी करुन सत्तेत बसले आहेत ते राहुल गांधी यांच्यावर तुटून पडले आहेत, असा टोला नाना पटोले यांनी लगावला.
"राहुल गांधी यांचा लोकशाही वाचली पाहिजे यासाठी प्रयत्न आहे. पण लोकशाहीला संपवण्याचं काम केंद्रातील सरकार करत आहे. आज आमचे मित्र फडणवीस यांनी सांगितलं की राहुल गांधी संविधानिक संस्थांवर आरोप घेत आहेत. "माझा फडणवीस यांना प्रश्न आहे, पहिल्या अधिवेशनावेळी काँग्रेसने निवडणूक आयोगाला प्रश्न विचारला आहे. त्याचं उत्तर फडणवीस यांनी का द्यावे?", असा सवालही नाना पटोले यांनी केला.
'आम्हाला मॅच फिक्सिंग झाल्याचा संशय'
"जी ४६ लाख मतं वाढली आहेत. ती कोण आहेत? आम्ही याबाबत पुरावे दिली आहेत. त्याचं उत्तर निवडणूक आयोगाने द्यायचं आहे. निवडणूक आयोग माध्यमांसमोर का आले नाहीत. ट्विटच्या माध्यमातून आकडेवारी त्यांनी दिली. आम्ही निवडणूक आयोगाला फुटेज मागितले. यावर आयोगाने फुटेज देत येत नाही असा जावई शोध काढला. यामुळे आता आम्हाला मॅच फिक्सिंग झाल्याचा संशय आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला. लोकशाही वाचवण्यासाठी सुप्रीम कोर्ट आम्हाला सहकार्य करेल ही आमची अपेक्षा आहे, असंही पटोले म्हणाले.