खराब हवामानामुळे शेतकऱ्यांना अनेकदा मोठ्या नुकसानीला सामोरे जावा लागते. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या वेदर इन्फॉर्मेशन नेटवर्क डेटा सिस्टम प्रोजेक्ट प्रकल्प अंतर्गत महाराष्ट्र सरकारने राज्यातील प्रत्येक गावात स्वयंचलित हवामान केंद्र (AWS) स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शेतकऱ्यांना आधीच खराब हवामानाची अचूक माहिती मिळेल. सध्या महाराष्ट्रात प्रत्येक महसूल मंडळ स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्रे बसवण्यात आली आहेत. परंतु, आता राज्य सरकारने सरकारी ठराव जारी करून राज्यातील प्रत्येक गावात एडब्लूएस बसवण्याची घोषणा केली.
राज्यातील सर्व गावांना हवामानाची अचूक माहिती देण्यासाठी आणि शेतकऱ्यांना हवामान- आधारित कृषी सल्ला आणि मार्गदर्शन देण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा आहे. या प्रकल्पात राज्यातील महसूल विभाग स्तरावर एक स्वयंचलित हवामान केंद्र स्थापन करण्यात आले आहे. शेराज्यातील सर्व गावांमध्ये हवामानविषयक अचूक माहिती मिळावी, असे या प्रकल्पामागचा उद्देश आहे. या केंद्रांद्वारे तापमान, पर्जन्यमान, सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि दिशा या हवामानविषयक घटकांची माहिती प्राप्त होते.
ग्रामपंचायत स्तरावर केंद्रांची उभारणी झाल्यास दुष्काळ, आग, पूर, गारपीट, ढगफूटी, थंडीची लाट, कडाक्याची थंडी आदी नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने हवामानविषयक माहिती उपलब्ध होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज (१७ जून २०२५) राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर करून कृषी क्षेत्रात परिवर्तन घडवून आणले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.