कुंदन पाटील लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : स्वातंत्र्याच्या लढ्यात जनजाती समाजातील अनेक नायक लढले. मात्र, दुर्दैवाने इतिहासाने त्यांच्यावर अन्याय केला. या नायकांचा इतिहास आपल्यापर्यंत पोहोचू दिला नाही. जनजाती समाजातील नायकांना अपराधी ठरवण्याचा प्रयत्न झाला आणि स्वातंत्र्यानंतरही त्यांच्या योगदानाला उपेक्षाच मिळाली. मात्र, प्रत्येक जिल्ह्यातील नायकांना शोधून त्यांची स्मारके उभारण्याचा आम्ही निश्चय केला आहे. त्यातून नव्या पिढीला नक्कीच प्रेरणा मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी धरणगाव येथे व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने या नायकांना योग्य सन्मान देण्याचा विडा उचलला असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
धरणगाव येथील क्रांतिकारक ख्वाजा नाईक यांच्या स्मारकासह संग्रहालयाचे उद्घाटन आणि गोद्री (ता. जामनेर) येथील हिंदू गोर बंजारा- लबाना समाज कुंभ प्रेरणा स्थळाच्या ई-भूमिपूजनानंतर ते बोलत होते. धरणगाव महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित आदिवासी, जनजातींसह विविध समुदायांच्या लढवय्या भूमिकेची त्यांनी प्रशंसा केली.
‘बोल बच्चन भैरवींना मी उत्तर देत नाही!शिवसेनेच्या वर्धापनदिनी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीवरून जोरदार टीका केली. ‘मराठी माणसाची शक्ती एकत्र येऊ नये म्हणून यांच्या मालकाचे नोकर इकडेतिकडे गाठीभेटी घेत आहेत,’ असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला होता. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही,’ अशा मोजक्या शब्दांत उत्तर देत ठाकरेंच्या टीकेला फारसे महत्त्व न दिल्याचे जळगाव दौऱ्यातून स्पष्ट झाले. मुख्यमंत्री फडणवीस शुक्रवारी जळगाव दौऱ्यावर आले होते. धरणगाव येथे क्रांतिवीर ख्वाजा नाईक यांच्या स्मारक व संग्रहालयाच्या उद्घाटनासाठी जाण्यासाठी त्यांचे जळगाव विमानतळावर आगमन झाले. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.