मुंबई: देशात आणीबाणी लागू झाली, त्याला ५० वर्षे येत्या २५ जून रोजी पूर्ण होत असताना आणीबाणीतील बंदीवानांच्या मासिक मानधनात दुप्पट वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी घेतला. तसेच मानधनधारकांच्या हयात जोडीदारालाही मानधन देण्याचा आणि अन्य काही अटी शिथिल करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
आणीबाणीच्या काळात एक महिन्यापेक्षा जास्त कारावास भोगलेल्यांना दरमहा मासिक २० हजार रूपये व त्यांच्या पश्चात पत्नीस किंवा पतीस दरमहा १० हजार रूपये मानधन देण्यात येईल. आधी हे मानधन १० हजार रुपये होते. एक महिन्यापेक्षा कमी कारावास भोगलेल्या आणीबाणीधारकांना दरमहा १० हजार रूपये तर त्यांच्या पश्चात पत्नीस किंवा पतीस पाच हजार रूपये मानधन देण्यात येईल. आधी १० हजारांऐवजी पाच हजार रुपये मानधन दिले जायचे.
हे आहेत निकष - मानधनासाठी जिल्हाधिकारी यांचेकडे नव्याने अर्ज करणे आवश्यक आहे. तसेच आणीबाणीच्या काळात कारावास भोगलेली व्यक्ती २ जानेवारी, २०१८ पूर्वी हयात नसल्यास त्याच्या पश्चात त्याच्या जोडीदारास शपथपत्र जोडून अर्ज करता येणार आहे.
- अटकेच्या वेळी किमान वय १८ असणे आवश्यक असल्याची अट आता रद्द केली आहे. ‘मिसा’ अंतर्गत तुरुंगवास भोगलेल्या व्यक्तींना मानधन देण्याचा निर्णय तत्कालीन फडणवीस सरकारने २०१८ मध्ये घेतला होता. परंतु, मविआ सरकारने तो रद्द केला होता. नंतर एकनाथ शिंदेंच्या काळात तो पुन्हा लागू करण्यात आला.