‘महाराष्ट्र भूषण’वरून राष्ट्रवादीत खदखद!
By Admin | Updated: August 21, 2015 01:25 IST2015-08-21T01:25:00+5:302015-08-21T01:25:00+5:30
बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यावरून आ. जितेंद्र आव्हाड यांनी राज्यभर उभारलेल्या आंदोलनामुळे राष्ट्रवादीत मोठ्या प्रमाणावर खदखद सुरू झाली आहे

‘महाराष्ट्र भूषण’वरून राष्ट्रवादीत खदखद!
अतुल कुलकर्णी, मुंबई
बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यावरून आ. जितेंद्र आव्हाड यांनी राज्यभर उभारलेल्या आंदोलनामुळे राष्ट्रवादीत मोठ्या प्रमाणावर खदखद सुरू झाली आहे. पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, अजित पवार यांच्या भिन्न भूमिका पाहता आम्ही नेमके करायचे तरी काय या प्रश्नाने ज्येष्ठ नेत्यांना ग्रासले आहे.
पक्षातल्या अनेक ज्येष्ठ नेत्यांशी बोलल्यानंतर ही खदखद मोठ्या प्रमाणावर समोर आली आहे. आधी बाबासाहेबांना पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अजित पवार यांनी पुरस्काराच्या बाजूने भूमिका घेतली. २ मे रोजी खा. सुप्रिया सुळे यांनी पुरंदरेंना अभिनंदनाचे पत्रही पाठवले. मात्र त्याच काळात आव्हाड सतत पुरंदरेविरोधी भूमिका घेत राहिले. त्यावर हे त्यांचे व्यक्तिगत मत आहे असे सांगणाऱ्या अजित पवार यांनी एकदम उलट भूमिका घेतली. तर शरद पवारांनी पुरंदरे इतिहास संशोधक नाहीत असे सांगितले. त्यावरून वाद रंगल्यानंतर आता हे वाद थांबवा असे विधान त्यांनीच केले. या सगळ्या पार्श्वभूमीवर आम्ही नेमके बोलायचे तरी काय?, प्रतिक्रिया तरी काय द्यायच्या? असे प्रश्न ज्येष्ठ नेत्यांपुढे निर्माण झालेत.
पत्रकार सतत विचारणा करू लागले तेव्हा आव्हाड यांचे ते व्यक्तिगत मत आहे, असे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले. तर शरद पवार यांनीही या वादावर
पडदा टाका असे स्पष्ट केले. तरीही माजी प्रदेश कार्याध्यक्ष आणि पक्षातर्फे मंत्रीपद मिळालेल्या आव्हाड यांनी ठाण्यात राष्ट्रवादीतर्फे राज्यभर शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर माफी आंदोलन केले. जर आव्हाड यांची ती व्यक्तीगत भूमिका होती तर पक्षातर्फे या विषयावर त्यांनी कोणाच्या परवानगीने आंदोलन केले? जर त्यांना परवानगी दिली असेल तर पुरंदरेंना विरोध ही आव्हाडांची व्यक्तीगत भूमिका कशी काय होते? आणि जर परवानगी मागितली नसेल तर त्यांनी पक्षाच्या नावावर केलेल्या आंदोलनामुळे पक्षशिस्त मोडली आहे असे मानले पाहिजे का? असे सवाल आता उपस्थित झाले आहेत.
मध्यंतरी आव्हाड यांना संरक्षण देण्यावरुन शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले. नंतर पुरंदरे प्रकरण घडले. त्यातही शरद पवार यांनी केलेली विधाने पक्षआ. आव्हाड यांच्या पाठीशी उभा असल्याचे दाखवणारी ठरली. परिणामी आम्ही पक्षात नको असू तर आम्हाला तसे सांगून तरी टाकावे या शब्दात काही ज्येष्ठ नेत्यांनी आपल्या मनातली खदखद बोलून दाखवली.
एकूणच पक्षात टोकाची नाराजी आहे. कोणी बोलून दाखवत नाही पण पुरंदरे प्रकरणात जे काही घडले त्याची गोळा बेरीज केली तर पक्ष म्हणून राष्ट्रवादीच्या पदरी अपयशच आले. पक्ष बॅकफूटवर गेला आणि त्यात पुन्हा पुरंदरे यांनी आपल्या पुरस्काराच्या १० लाखात स्वत:चे १५ लाख घालून सगळी रक्कम कॅन्सर रुग्णांना देऊ केली आणि भाषणात शिवाजी महाराजांसारखा जाणता राजा कसा कोळी, माळी, मराठा, मुस्लिम समाजातल्या लोकांना बरोबर घेऊन लढला याचे अनेक दाखले दिल्याने तर राष्ट्रवादीच्या आंदोलनावर पुरते पाणी पडल्याचे निष्कर्ष पक्षात काढले जात आहेत.