‘नीट’मुळे एका पिढीच्या भविष्याचे नुकसान - देवेंद्र फडणवीस
By Admin | Updated: May 14, 2016 22:55 IST2016-05-14T22:55:05+5:302016-05-14T22:55:05+5:30
सर्वोच्च न्यायालयाचा आपण आदर करतो. ‘नीट’ विद्यार्थ्यांसाठी अन्यायकारक आहे. ‘नीट’च्या निर्णयामुळे संपूर्ण पिढीच्या भविष्याचे नुकसान होण्याचा धोका आहे,

‘नीट’मुळे एका पिढीच्या भविष्याचे नुकसान - देवेंद्र फडणवीस
नागपूर : सर्वोच्च न्यायालयाचा आपण आदर करतो. ‘नीट’ विद्यार्थ्यांसाठी अन्यायकारक आहे. ‘नीट’च्या निर्णयामुळे संपूर्ण पिढीच्या भविष्याचे नुकसान होण्याचा धोका आहे, या शब्दांत मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयाने ‘नीट’बाबत दिलेल्या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने विचार करावा, असे प्रतिपादनदेखील त्यांनी केले. नागपूरात एका कार्यक्रमादरम्यान बोलताना त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
महाराष्ट्रात वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी ‘सीईटी’ दिली. परंतु ‘एमबीबीएस’ व ‘बीडीएस’चे प्रवेश ‘नीट’च्या माध्यमातूनच होतील असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला व राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना धक्का बसला. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी नागपूरात भाष्य केले.
‘नीट’ चा मुद्दाच विद्यार्थ्यांसाठी खरोखरच अन्यायकारक आहे. विद्यार्थी वेगळ््या अभ्यासक्रमाची तयार करत असताना, एका दिवसात म्हणता की ‘सीबीएससी’च्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा देऊन द्या. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय आहे व आपल्या देशात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर टीका करण्यात येत नाही. सर्वोच्च न्यायालय आपल्यासाठी मोठीच गोष्ट आहे. परंतु न्यायालयानेदेखील विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करायला हवा. कायदा आपल्या जागी आहे व तो ठीकदेखील आहे. परंतु यामुळे जर एका पिढीचे नुकसान होत असताना याचा विचार व्हायला हवा, असे मुख्यमंत्री म्हणाले.