साई संस्थानच्या नियुक्त्या लांबणीवर
By Admin | Updated: March 21, 2015 01:32 IST2015-03-21T01:32:04+5:302015-03-21T01:32:04+5:30
शिर्डीच्या विकासाप्रमाणेच साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळासह अन्य महामंडळांच्या नियुक्त्या सेना-भाजपातील गृहकलहामुळे पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे़

साई संस्थानच्या नियुक्त्या लांबणीवर
प्रमोद आहेर - शिर्डी
शिर्डीच्या विकासाप्रमाणेच साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळासह अन्य महामंडळांच्या नियुक्त्या सेना-भाजपातील गृहकलहामुळे पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे़ अशाच अंतर्गत धुसफुसीमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकारही या नियुक्त्या अखेरपर्यंत करू शकले नव्हते़
भाजपाने सरकार स्थापन केल्यानंतर राजकीय तडजोडीसाठी महामंडळाच्या नियुक्त्या मागे ठेवल्या़ त्यात साईसंस्थानही अडकले आहे. साई संस्थान तसेच चांगली महामंडळे आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी दोन्हीही पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू होती़ मात्र सेना-भाजपातील कलहाने पेट घेतल्याने भाजपाकडून सावध पावले टाकण्यात येत आहेत़ राजकीय घडामोडीत सत्तेतील साथीदार बदलले तर महामंडळ सदस्यांच्या नियुक्त्या कार्यकाल संपेपर्यंत किंवा तत्काळ मागे घेणे अवघड असल्याची भाजपाला जाणीव आहे़ त्यामुळे सेनेशी असलेले मतभेद संपुष्टात येत नाहीत, तोवर भाजपाकडून संस्थानसह महामंडळाच्या नियुक्त्या होण्याची शक्यता धूसर झाली आहे़ त्यातच अलीकडे भाजपा व राष्ट्रवादीचे मधुर संबंध पुन्हा प्रस्थापित होवू पहात आहेत़ त्याचाही परिणाम या नियुक्त्यांवर होऊ शकतो. या सर्व शक्यता विचारात घेता राजकीय धूळवड संपल्याशिवाय साईबाबा संस्थान व महामंडळाची गुढी उभारण्याची शक्यता मावळली आहे़
आगामी कुंभमेळ व साई समाधी शताब्दीच्या पार्श्वभूमीवर विकासकामे तातडीने मार्गी लागण्यासाठी विश्वस्त मंडळ आवश्यक आहे़ पायाभूत सुविधांच्या कमतरतेने व गर्दी व्यवस्थापनातील त्रुटीमुळे काही दुर्घटना घडली तर ही राजकीय धुळवड महागात पडू शकेल, अशी चर्चा आहे.