जोपर्यंत बहुमत नाही तोपर्यंत शिवसेनेला सहन करणार - सुधीर मुनगंटीवार
By Admin | Updated: October 15, 2015 17:33 IST2015-10-15T16:28:00+5:302015-10-15T17:33:55+5:30
जोपर्यंत भाजपाला संपूर्ण बहुमत मिळत नाही तोपर्यंत शिवसेनेला सहन करणार असे स्पष्ट प्रतिपादन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

जोपर्यंत बहुमत नाही तोपर्यंत शिवसेनेला सहन करणार - सुधीर मुनगंटीवार
>
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १५ - जोपर्यंत भाजपाला संपूर्ण बहुमत मिळत नाही तोपर्यंत शिवसेनेला सहन करणार असे स्पष्ट प्रतिपादन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. जनतेने आम्हाला कौल दिला की तुम्ही एकटे सत्ता स्थापन करू शकत नाही, युती करावीच लागेल आणि जनतेचा हा कौल आम्ही प्रमाण मानून एकत्र सत्ता स्थापन केल्याचे ते म्हणाले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना आमचे ध्येय स्पष्ट असल्याचे शत प्रतिशत भाजपाचा उच्चार न करता सांगितले.
शिवसेनेनं एकदिलाने जनतेची कामं करण्यासाठी पुढे यायला हवं असं सांगताना तसं झालं तर पुढील काळातही एकत्र काम करू अन्यथा जनता जो कौल देईल तो मान्य करू असे सूचक उद्गारही त्यांनी काढले.
इंदू मिलच्या भूमीपूजनाला उद्धव ठाकरे यांना एक दिवस आधी निमंत्रण दिलं हा अपमान नसल्याचं मत त्यांनी मांडलं. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या थोर पुरुषाच्या सन्मानासाठी अशा छोट्या मोठ्या गोष्टी बाजुला ठेवायला हव्यात अशी भूमिका मुनगंटीवार यांनी मांडली. त्या कार्यक्रमाला खुद्द मला बोलावणं नव्हतं, रावसाहेब दानवेंना बोलावणं नव्हतं असं सांगत तरी आम्ही गेलोच ना असे ते म्हणाले.
कल्याण डोंबिवलीमध्ये महापालिका निवडणुकीमध्ये युती झालेली नाही, या पार्श्वभूमीवर बोलताना निवडणूक पार पडल्यानंतरच यासंदर्भात निर्णय घेऊ असे सांगत सध्यातरी स्वबलावर सत्ता आणण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे सुधीरभाऊ म्हणाले.
मुनगंटीवार यांच्या मुलाखतीतले मुद्दे पुढीलप्रमाणे:
- राज्यातील शेतक-यांच्या ताटात घास पडावा म्हणून आम्ही पेट्रोल, दारू, सिगरेटवरील कर वाढवले, जर याला कोणी पाकिटमारी म्हणत असेल, तर शेतक-यांसाठी आम्ही ही पाकिटमारी केली त्याचा मला अभिमान, आणि अशी पाकिटमारी मी पुन्हा पुन्हा करेन.
- दुष्काळ जाहीर करण्यासाठी विशिष्ट कालमर्यादा व नियम असतात. दुष्काळ जाहीर केला नसला तरी ९५० कोटी रुपये खर्च करून १४ जिल्ह्यांमध्ये २ ते ३ रुपये किलो दराने धान्य दिले.
- विधानसभा निवडणुकीत आम्हाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही पण जनतेला वारंवार निवडणुकीला सामोरं जावं लागू नये म्हणून भाजपा-शिवसेनेने एकत्र येऊन जनतेची सेवा करण्याचा निर्णय घेतला.
- जनतेच्या हितासाठी आम्ही रोज एक निर्णय घेतो.
- बहुमत मिळेपर्यंत शिवसेनेला सहन करणार.
- आरक्षणासंदर्भात सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आला.
- बिहार निवडणूक आणि आंबेडकर स्मारकाच्या भूमीपूजनाचा संबंध नाही.
- आमचा संसार मारून, मुटकून केलेला नाही.
- निमंत्रण कधी दिलं हा मान-अपमानाचा मुद्दा होऊच शकत नाही. एक दिवस आधी दिलं तर अपमान आणि आठ दिवस आधी दिलं तर सन्मान असं होत नाही.