सत्तावीस कुटुंबांच्या आयुष्यात प्रकाश

By Admin | Updated: May 8, 2014 15:16 IST2014-05-08T12:49:04+5:302014-05-08T15:16:33+5:30

खेड : तीन वर्षे अंधारात काढलेल्या ‘त्या’ २७ कुटुंंबांची घरं अखेर प्रकाशमान झाली

Light in the life of twenty-seven families | सत्तावीस कुटुंबांच्या आयुष्यात प्रकाश

सत्तावीस कुटुंबांच्या आयुष्यात प्रकाश

. आपल्या घरी वीज आल्याचा आनंद या लोकांच्या चेहर्‍यावर दिसून येत होता. त्यांच्यात कमालीचा उत्साह दिसत होता. ही फार लांबची कथा नाही तर खेड तालुक्यातील गुणदे येथील गणवाल कळंबटेवाडीतील आहे. येथे राहणारी सर्व कुटुंब शेलारवाडी धरण प्रकल्पग्रस्त आहेत. पुनर्वसनाची वेळ आली, तेव्हा या मंडळींनी स्वेच्छा पुनर्वसनाचा मार्ग स्वीकारला. गुणदेमध्ये आता जिथे वस्ती आहे, ती जमीन विकत घेऊन त्यांनी नव्याने घरं बांधली आणि आपला वर्षानुवर्षांचा संसार नव्या घरांमध्ये हलवला. घरं झाली होती, लोकं तिथं राहायला गेले होते. पण, वीज नव्हती. याचं कारण काही खासगी जमिनींच्या सात-बारावर असलेली असंख्य नावे! वीज पुरवठ्यासाठी महावितरण कंपनीकडे प्रस्ताव पाठवण्यासाठी जमीनमालकांनी ग्रामपंचायतीला संमतीपत्र देणे गरजेचे होते. ही संमती मिळत नव्हती. त्यामुळे ग्रामपंचायत या कुटुंंबांना घरपट्टी देत नव्हती. परिणामी प्रस्ताव जात नव्हता. अशा विचित्र कात्रीत कळंबटेवाडीतील लोक सापडले होते. त्यामुळे तब्बल तीन वर्षे या लोकांना काळोखातच काढावी लागली होती. जमीन मालकांची संमतीपत्र सादर करूनही अधिकारी दाद देत नव्हते. आतापर्यंत स्वत: प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही यश येत नाही, हे लक्षात आल्यानंतर वाडीतील ग्रामस्थ बबलू आंब्रे यांच्या माध्यमातून माजी पालकमंत्री भास्कर जाधव यांच्यापर्यंत पोहोचले. स्वेच्छा पुनर्वसन असल्याने आमदार जाधव यांनी तत्काळ हा विषय ऊर्जामंत्री अजित पवार यांच्या जनता दरबारात उपस्थित केला. अजित पवार यांनीही बसल्या जागेवरून वीज खात्याच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना सूचना केली. त्यामुळे यंत्रणा कामाला लागली. तीन वर्षे वीज मिळावी म्हणून धडपडणार्‍या कळंबटेवाडीचा प्रश्न अवघ्या काही मिनिटांत मार्गी लागला होता. यानंतरच्या काही दिवसांतच काम पूर्ण होऊन विजेच्या दिव्यांनी घरे उजळली. तीन वर्षांपासूनचा अंधार दूर करणार्‍या भास्कर जाधव यांचा वाजतगाजत सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)

Web Title: Light in the life of twenty-seven families