जीवघेणी बेशिस्त
By Admin | Updated: November 26, 2014 01:11 IST2014-11-26T01:11:10+5:302014-11-26T01:11:10+5:30
झपाट्याने विकसित होणाऱ्या नागपुरात जीवघेण्या अपघाताचे प्रमाण सारखे वाढतच आहे. जीवन अनमोल असल्याचे बेदरकार वाहनचालकांना मान्य नाही. दुसऱ्याच्या जीवाची त्यांना कदर नाही,

जीवघेणी बेशिस्त
११ महिन्यांमध्ये ५०० पेक्षा जास्त अपघात
नागपूर : झपाट्याने विकसित होणाऱ्या नागपुरात जीवघेण्या अपघाताचे प्रमाण सारखे वाढतच आहे. जीवन अनमोल असल्याचे बेदरकार वाहनचालकांना मान्य नाही. दुसऱ्याच्या जीवाची त्यांना कदर नाही, त्यामुळेच लाखमोलाची माणसे रस्त्यांवर किड्या-मुंग्यांप्रमाणे चिरडली जात आहेत. सोमवारी दुपारी एक महिला वकील आणि एक विद्यार्थी असेच चिरडले गेले अन् पुन्हा एकदा अपघाताचा भयावह विषय चर्चा अन् चिंता वाढवणारा ठरला आहे.
देशाचे हृदयस्थान आणि संत्र्याचे शहर म्हणून नागपूर शहराची देशभर ख्याती होती. म्हणूनच की काय नागपूर झपाट्याने वाढू लागले. लोकसंख्या वाढली, वाहने वाढली अन् दुर्दैवाने अपघातही वाढले. गेल्या ११ महिन्यांमध्ये नागपुरात ५०० पेक्षा जास्त अपघात घडले. यात २१९ जणांचे बळी गेले. ४ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर या २० दिवसांमध्ये दोन विद्यार्थ्यांसह १५ जणांचे बळी गेले तर, २५ जण जबर जखमी झाले. अपघातातील मृत आणि जखमींची संख्या बघता उपराजधानीतील वाहतूक व्यवस्था किती बेशिस्त आहे अन् वाहनचालक किती निर्ढावले आहेत त्याचा प्रत्यय येतो. यामुळे नागपूर आता ‘हादसों का शहर’ म्हणून ओळख मिळवते की काय, अशी भीतीदायक स्थिती आहे.(प्रतिनिधी)
असून नसल्यासारखे
नागपूर शहरात ५०० पेक्षा जास्त चौक आहेत. यापैकी मुख्य मार्गांना जोडणाऱ्या १४३ चौकात सिग्नल आहेत. (त्यातील ३८ नादुरुस्त आहेत.) शहरातील वाहतूक सुरळीत असावी आणि वाहनचालकांनी शिस्तीत वाहने चालवावी, यासाठी चौकाचौकात सिग्नल असतात. वाहतुकीचे नियम मोडणारांना चाप बसविण्यासाठी वाहतूक पोलिसांचीही तैनाती असते. मात्र, हे सारेच असून नसल्यासारखे आहे. वाहतूक शाखेच्या पोलिसांनी चौकात उभे असावे, यासाठी प्रत्येक सिग्नलच्या बाजूला किंवा मध्ये एक छोटीशी पोलीस चौकी असते. झांशी राणी आणि व्हेरायटी चौक आणि आणखी एखाद दुसऱ्या चौकातला अपवाद वगळता कोणत्याच सिग्नलवर पोलीस उभे दिसत नाहीत. ते उभे असतात सिग्नलपासून काही अंतरावर, एखाद्या झाडाच्या आडोशाला. ते चौकात-सिग्नलवर दिसत नसल्यामुळे निर्ढावलेले वाहनचालक भरधावपणे वाहन दामटतात. या बेशिस्त वाहनचालकामुळे दुसऱ्याच कुण्या वाहनचालकाला धोका होतो अन् भलत्याच्याच जीवावर बेतते.
सारेच धक्कादायक
येथील वाहतूक नियंत्रित करण्यासाठी पोलिसांची स्वतंत्र वाहतूक शाखा आहे. मात्र, ती खिळखिळी आहे. शहरातील चौकांचा आणि सिग्नलचा विचार केल्यास किमान ११०० पोलीस कर्मचाऱ्यांची वाहतूक शाखेला गरज आहे. मात्र, वाहतूक शाखेच्या पोलिसांची संख्या केवळ ५७० आहे. त्यांना सांभाळण्यासाठी २५ पीआय आणि पीएसआय आहेत. आजारी आणि साप्ताहिक रजा अन् अन्य संबंधित कारणे लक्षात घेतल्यास यापैकी रोज केवळ ३५० पोलीस प्रत्यक्ष कर्तव्यावर असतात. वाहतूक नियंत्रित करण्यासोबतच शहरात येणाऱ्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची (व्हीव्हीआयपींची) वाट मोकळी करून देण्याचीही जबाबदारी याच पोलिसांना सांभाळावी लागते. बेभान होऊन वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांची संख्या अन् उपद्रव वाढत असताना वाहतूक शाखेच्या पोलिसांजवळ एकही स्पीड गन (गती मोजणारे उपकरण) नाही, ही सर्वात धक्कादायक बाब आहे.
अपघात कुणाच्या चुकीमुळे झाला ते महत्त्वाचे नाही. अपघातात लाखमोलाचा जीव जातो, ही बाब लक्षात घ्यावी. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याची गरज आहे. प्रत्येक वाहनचालकाने शिस्तीने वाहन चालविले तर लाख मोलाचा जीव वाचविणे शक्य आहे. बेशिस्त वाहनचालकांना लगाम घालण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. उद्यापासून पोलीस अधिक दक्षपणे आपली जबाबदारी पार पाडतील. बेशिस्त वाहनचालकांना धडा शिकविण्यासाठी अन्य वाहनचालकांनीही पुढाकार घेतल्यास अपघात रोखण्याचे आणि वाहतुकीला वळण लावण्याचे महत्त्वाचे काम सहज होऊ शकते.
भरत तांगडे
पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा