भाडेवाढ कमी करण्याबाबत सकारात्मक विचार करू - रेल्वेमंत्री
By Admin | Updated: June 24, 2014 11:20 IST2014-06-24T11:15:27+5:302014-06-24T11:20:20+5:30
मुंबईकरांच्या भावना लक्षात घेऊन, रेल्वे भाडेवाढ कमी करण्याबाबत सकारात्मक विचार करू, असे आश्वासन रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी दिल्याने जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.

भाडेवाढ कमी करण्याबाबत सकारात्मक विचार करू - रेल्वेमंत्री
ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. २४ - मुंबईकरांच्या भावना लक्षात घेऊन, रेल्वे भाडेवाढ कमी करण्याबाबत सकारात्मक विचार करू, असे आश्वासन रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी दिल्याने जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. महायुतीच्या शिष्टमंडळाने मंगळवारी गौडा यांची भेट घेऊन भाडेवाढ कमी करण्याबाबत चर्चा केली.
गेल्या आठवड्यात सरकारने घेतलेल्या रेल्वे भाडेवाढीच्या निर्णयाचा मुंबईकरांना सर्वात जास्त फटका बसला. नाराज मुंबईकरांनी भाडेवाढ मागे घेण्याची मागणी सुरू केली. याच पार्श्वभूमीवर महायुतीच्या शिष्टमंडळाने विनोद तावडेंच्या नेतृत्वाखाली मंगळवारी दिल्लीत रेल्वेमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी भाडेवाढीच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची व हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली. त्यावेळी बोलताना रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी, या मुद्यावर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले. आज संध्याकाळपर्यंत याबाबात अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
महायुतीचे शिष्टमंडळ- रेल्वेमंत्री यांच्या बैठकीसाठी विनोद तावडेंसह किरीट सोमय्या, रामदास आठवले, गजानन कीर्तिकर, पूनम महाजन, राहुल शेवाळे, अरविंद सावंत, श्रीकांत शिंदे, रविंद्र चव्हाण आदी नेते उपस्थित होते.