लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: सध्या प्रत्येक पक्ष आपापली शक्ती वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. प्रत्यक्ष निवडणूक येईल त्यावेळी आम्ही एकत्र बसून ठरवू, त्याविषयी आताच काही सांगण्याची घाई नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. पत्रकारांशी बोलताना आमच्यात चांगला एकोपा आहे, कोणतेही मतभेद नाहीत, असा दावाही पवार यांनी केला.
मंत्र्यांना काही सांगायचे असेल तर मंत्रिमंडळाच्या बैठकीत बोलणे योग्य असते. बाहेर काही बोलल्यास त्याच्या विनाकारण बातम्या होतात, हे लक्षात घ्यायला हवे. महाराष्ट्र सुसंस्कृत राजकारणासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे लक्ष्मण हाके व अमोल मिटकरी यांच्यातील संभाषण मुळीच आवडले नाही, बोलताना सर्वांनीच तारतम्य ठेवायला हवे, असेही ते म्हणाले.
लाडक्या बहिणींसह कोणत्याही समाजघटकावर कसल्याही प्रकारे अन्याय होणार नाही, याची काळजी राज्य सरकार घेत आहे. सामाजिक न्याय विभागाकडून पैसे वर्ग करण्यात आले हे खरे आहे. मात्र, त्यांना अंदाजपत्रकात त्याप्रमाणे वाढही करून दिली आहे. मुख्यमंत्र्यांचा शब्द अंतिम असतो. त्यांनी अन्याय होणार नाही असे सांगितले म्हणजे तेच अंतिम आहे, असेही अजित पवार यांनी सांगितले.