गरिबांचा नेता, श्रमिकांचा ‘अण्णा’
By Admin | Updated: February 21, 2015 03:03 IST2015-02-21T03:03:24+5:302015-02-21T03:03:24+5:30
गोविंद पानसरे हे तसे ‘अण्णा’ या नावाने महाराष्ट्राला परिचित. गेल्या ५० वर्षांतील महाराष्ट्रातील असे एकही आंदोलन नसेल की, त्याच्याशी काही ना काही त्यांचा संबंध आला नाही.

गरिबांचा नेता, श्रमिकांचा ‘अण्णा’
नरेंद्र दाभोलकर यांचा खून हा त्यांच्या विचारासाठी झालेला खून आहे. त्यांच्या व्यक्तिगत जीवनात, व्यक्तिगत कामांसाठी त्यांना कोण शत्रू असणे संभवत नाही. त्यांनी जी विज्ञाननिष्ठा प्रतिपादली आणि ज्या विज्ञाननिष्ठेसाठी कार्य केले, त्यामुळे महाराष्ट्रभर अनेक शत्रू तयार झाले. त्यांच्या विवेकवादास विवेकाने उत्तर देऊन त्यांचा विचार आणि व्यवहार पराभूत करता येत नाही, असे ज्या फॅसिस्ट प्रवृत्तीच्या लोकांना वाटत होते, त्या प्रवृत्तीमधूनच हा खून झाला आहे. महात्मा गांधींचा खूनही अशाच कारणासाठी झाला होता. त्यांचा खून हिंदू-मुस्लिम ऐक्याचा सर्वधर्म समभावाचा विचार विचारांच्या साहाय्याने पराभूत करता येत नाही, असे ज्या शक्तींना वाटत होते, त्यांनी त्याच कारणासाठी त्यांचा खून केला, असे वारंवार सांगणारे ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत अॅड. गोविंद पानसरे यांच्यावरही त्याच कारणासाठी हल्ला व्हावा, हा किती दैवदुर्विलास.
गोविंद पानसरे हे तसे ‘अण्णा’ या नावाने महाराष्ट्राला परिचित. गेल्या ५० वर्षांतील महाराष्ट्रातील असे एकही आंदोलन नसेल की, त्याच्याशी काही ना काही त्यांचा संबंध आला नाही. कृतिशील विचारवंत, गोरगरीब, श्रमिक, कामगार यांच्या हितासाठी जीव पणाला लावून झगडणारे नेते, असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीला सगळ्यात मोठा आधार हा पानसरे अण्णांचा होता. त्यामुळे या चळवळीतील कोणत्याही नव्या मोहिमेची सुरुवात कोल्हापुरातून होत असे. कारण एकतर येथील भूमी परिवर्तनाला साद देणारी आणि दुसरे असे की, पानसरे यांचे पाठबळ. त्यामुळे दाभोलकर यांच्या हत्येनंतर त्यांच्या कार्याचा वसा उघड शत्रुत्व घेऊन कुणी पुढे नेला असेल, तर त्यात पानसरे यांचे नाव सगळ्यात अग्रभागी राहील. दाभोलकर यांचा खून सनातनी प्रवृत्तींनीच केला, असे ते जाहीरपणे सांगत होते. देशात सत्तांतर झाले आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे सरकार सत्तारूढ झाल्यावर महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसे याचे जाहीरपणे उदात्तीकरण सुरू झाले. त्याबद्दल त्यांना प्रचंड राग होता. त्यामुळे गेल्या पाच-सात महिन्यांत ते कुठेही गेले, तर त्यांच्या भाषणात हाच मुद्दा प्रकर्षाने येत होता. गेल्या रविवारी चिंचवाड (ता. करवीर) येथे ग्रामीण साहित्य संमेलन झाले. त्यावेळी गावांत शाळकरी मुलींनी गांधीजींचे चित्र रांगोळीने रेखाटले होते. त्याचा संदर्भ घेत ते म्हणाले की, या देशात आणखी काही दिवसांनी अशी स्थिती येईल की, गांधीजींच्या ऐवजी नथुराम गोडसेची रांगोळी शाळांमध्ये काढली जाईल. नथुराम गोडसे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाच कार्यकर्ता होता व त्याच विचाराचे सरकार देशात व राज्यातही सत्तेवर आल्याचे ते जाहीरपणे बोलत होते. दाभोलकर व पानसरे या व्यक्ती दोन; परंतु विचारधारा एकच.
पानसरे यांच्या आयुष्याकडून खूप गोष्टी शिकण्यासारख्या होत्या. त्यांचा ऐन उमेदीतील तरणाबांड मुलगा अवि पानसरे हा २ आॅक्टोबर २००३ ला एकाएकी गेला. त्याची अंत्ययात्रा दुसऱ्या दिवशी निघाली. ती बिंदू चौकातील कम्युनिस्ट पक्षाच्या दारात आल्यावर पानसरे अंत्ययात्रेच्या वाहनावर चढले व मूठ आवळून त्यांनी आरोळी दिली. ‘कॉम्रेड अवि पानसरे का अधुरा काम कौन पुरा करेगा...!’ त्यावर गर्दीतून तितक्याच जोराने प्रतिसाद आला. ‘हम करेंगे.. हम करेंगे...’ अण्णांना त्यापासून नवी उर्मी मिळाली. एखाद्या योद्ध्यासारखा हा माणूस सगळे दु:ख पाठीवर टाकून पुन्हा समाजाच्या भल्यासाठी संघर्षास तयार झाला. त्यांचे वय ८१ वर्षे होते. हृदयरोग, मधुमेहसारखे आजार सोबत करत होतेच. परंतु, नियमित व्यायाम, आहारावर नियंत्रण व सतत कार्यमग्न, यामुळे या वयातही ते झपाटल्यासारखे काम करायचे. एकदा एक काम हाती घेतले की, ते पूर्ण होईपर्यंत त्यांना विश्रांती नसे. त्यांच्या डोक्यातून अनेक नवनवीन कल्पना येत असत. अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त जमलेल्या निधीतून त्यांनी कोल्हापुरातील चळवळीतील कार्यकर्त्यांची चरित्रे लिहिण्याचा उपक्रम राबविला. ते स्वत:ही एक कसदार लेखक होते. अत्यंत सोप्या भाषेत लिहिण्याची त्यांना सवय होती. ‘शिवाजी कोण होता..’ हे पुस्तक ज्यांनी वाचले आहे, त्यांना त्याचा अनुभव नक्की येईल. त्यांचे वक्तृत्वही त्याच धाटणीतील होते. समोरच्या व्यक्तीशी संवाद साधत, त्याला सहभागी करून ते बोलत असत. त्या अर्थाने त्यांच्याइतका चांगला ‘सोशल कम्युनिकेटर’ आता महाराष्ट्रात नाही. जीवनाचे असे एकही क्षेत्र नाही की, जिथे पानसरे अण्णांचे काही ना काही योगदान नाही. चळवळीतील कार्यकर्त्याला ‘अण्णा’ या दोन शब्दांचा जसा दरारा होता, त्याहूनही जास्त मोठा आधार होता. त्यांच्याकडे आपण गेल्यास काहीतरी मार्ग निघेल, असा विश्वास लोकांना वाटे. आंदोलन टोलचे असो की कोणतेही, त्यात अण्णांचा सहभाग हा त्याला आपोआपच नैतिकतेचे पाठबळ मिळवून देई. पानसरे चुकीचे काही करणार नाहीत, असे मोठ्या समाजाला वाटे, हेच त्यांचे बळ होते. गोवा मुक्ती आंदोलनापासून ते संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, सीमा प्रश्न, रेशन धान्याच्या चळवळीपासून ते अगदी थेट पाईपलाईन योजनेपर्यंत शेकडो चळवळींत ते अग्रभागी राहिले.
काम कोणतेही असो, छोट्या-मोठ्या कार्यकर्त्याला सोबत घेऊन ते पुढे जात. स्वच्छ चारित्र्य हा अत्यंत दुर्मीळ गुण त्यांच्याकडे होता. दोन वर्षांपूर्वी त्यांना ‘शाहू’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्या समारंभातही त्यांनी समाजाच्या दुटप्पी वागण्यावर बोट ठेवले. महाराष्ट्र पुरोगामी आहे, असे म्हणणे सर्वांनी त्वरित थांबविले पाहिजे आणि महाराष्ट्राला पुरोगामी करण्याच्या कार्यासाठी व्यापक व सखोल प्रबोधनाचे कार्य चिकाटीने करत राहिले पाहिजे, असा आग्रह ते सातत्याने धरत राहिले. ज्या शाहू महाराजांच्या भूमीने महाराष्ट्राला आणि पर्यायाने देशाला समतेचा, पुरोगामित्वाचा विचार दिला, त्याच भूमीत पानसरे यांच्यासारख्या गोरगरिबांच्या नेत्यावर असा भ्याड हल्ला व्हावा, हे ही भूमी ते म्हणत तशी पुरोगामी राहिली नाही, याचाच दाखला देणारी घटना आहे. व्याख्यानमाला असो की सामाजिक चळवळ, ते लोकांना सतत एक आवाहन मनापासून करत. जे समाजाच्या भल्याचे आहे, ते आपण करत राहू, असा विश्वास ते लोकांना सतत देत. आजही त्यांचा तोच विचार पुढे नेण्याची खरी गरज आहे.
राजकीय कार्यकर्ते होणाऱ्यांच्या झुंडी तयार होत आहेत. कारण त्यापासून त्यांच्या व्यक्तिगत जीवनात काहीतरी लाभ होणार आहे. त्यास प्रतिष्ठा मिळणार आहे. त्यामुळे तिकडे जाणाऱ्यांची गर्दी वाढत आहे. परंतु, सामाजिक प्रबोधनाच्या चळवळीत काम करणे हे दिवसेंदिवस जिकिरीचे बनत चालले आहे. लोकांसाठी निष्ठेने, चारित्र्य स्वच्छ ठेवून व लोकांचाही विश्वास संपादन करून काम करणाऱ्यांची संख्या कमी होत आहे. अलीकडील काळात तो माझे ऐकत नाही ना, मग हाणा त्याला, मारा त्याला, ही दडपशाहीही वाढू लागली आहे. अशा काळात राज्यभरातील या चळवळीतील कार्यकर्त्यांच्या दृष्टीने दाभोलकर व पानसरे हे आदराचे स्थान होते. अशा घटना जेव्हा घडतात, तेव्हा चळवळीत काम करणाऱ्यांच्या वाटेला असे आयुष्य येऊ लागल्यावर समाजासाठी काम कोण करणार? असा प्रवाह बळावतो. अण्णांवरील हल्ल्यानंतर कोल्हापूरसह महाराष्ट्राच्या मनाला हाच प्रश्न सतावत आहे.
- विश्वास पाटील, कोल्हापूर
एका योद्ध्याचा जीवनपट
च्नाव : कॉ. गोविंद पंढरीनाथ पानसरे
च्जन्म : २६ नोव्हेंबर १९३३, कोल्हार (ता. श्रीरामपूर), जि. अहमदनगर
च्शिक्षण : बी.ए. (आॅनर्स), एलएल.बी., प्राथमिक शिक्षण - जन्मगावी कोल्हार येथे. माध्यमिक शिक्षण - राहुरी, जि. अहमदनगर व अहमदनगर येथे. महाविद्यालयीन शिक्षण - राजाराम कॉलेज, कोल्हापूर, शहाजी लॉ कॉलेज, कोल्हापूर, प्रिन्स शिवाजी बोर्डिंगमध्ये राहून शिक्षण घेतले.
च्व्यवसाय : कोल्हापुरात वृत्तपत्र विक्रेता म्हणून काही वर्षे काम.
च्म्युनिसिपालिटीत शिपाई म्हणून नोकरी, म्युनिसिपल स्कूल बोर्डात काही काळ प्राथमिक शिक्षक, १९६४ पासून वकिली. कोल्हापूर डिस्ट्रिक्ट बार असोसिएशनचे अनेक वर्षे अध्यक्ष, शिवाजी विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागात सहयोगी व्याख्याता म्हणून दहा वर्षे काम.
च्राजकीय जीवन : १) समाजवादी व डावा समाजवादी गट यांत प्राथमिक, राजकीय कार्य. २) १९५२ पासून भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सभासद.
३) दहा वर्षे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे महाराष्ट्र राज्य सेक्रेटरी.
४) भा.क.प.च्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य. ५) १९५५ साली गोवा मुक्ती आंदोलनात सहभागी. ६) गोवा मुक्ती आंदोलनातील सहभागाबद्दल शासनाची मान्यता व म्हणून स्वातंत्र्यसैनिक. ७) संयुक्त महाराष्ट्र समितीच्या कोल्हापूर जिल्हा शाखेचे आॅफिस सेक्रेटरी म्हणून सलग पाच वर्षे काम.
८) १९६५ च्या उपासमारविरोधी कृती समितीचे एक नेते.
च्विविध कामगार संघटनांचे पदाधिकारी : १) आॅल इंडिया ट्रेड युनियन कॉँग्रेस आयटकचे महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष. २) समाजवादी प्रबोधिनी या संस्थेच्या स्थापनेत सहभाग, स्थापनेपासून सलग पंचवीस वर्षे कार्यकारिणीवर सभासद. ३) पत्नी, मुलगा, मुलगी इत्यादी सर्व कुटुंब राजकीय, सामाजिक कार्यात सहभागी.
च्लिखाण : १. शिवाजी कोण होता? (१९८४) (एकूण २४ आवृत्त्या), कानडी, उर्दू, गुजराथी, इंग्रजी, हिंदी भाषेत प्रसिद्ध. आजवर एक लाख
प्रतींची विक्री.
२) मंडल आयोग आणि राखीव जागांचा प्रश्न (१९८३) (चार आवृत्त्या).
३) अजून न स्वीकारलेला मंडल आयोग (१९९७) (दोन आवृत्त्या). ४) मंडल आयोग आणि मागासलेले मुस्लिम (१९९८). ५) काही कामगार कायद्यांची तोंडओळख (१९९२) (चार आवृत्त्या). ६) ३७० कलमाची कूळकथा (१९९४). ७) मुस्लिमांचे लाड (१९९४) (तीन आवृत्त्या). ८) पंचायत राज्याचा पंचनामा. ९) अवमूल्यन : कळ सोसायची कुणी? १०) राजर्षी शाहू : वसा आणि वारसा (तीन आवृत्त्या). ११) शेतीधोरण परधार्जिणे (तीन आवृत्त्या).
१२) कामगारविरोधी कामगार धोरणे (तीन आवृत्त्या), वृत्तपत्रात अनेक लेख, मंडल आयोग व शिवचरित्रावर महाराष्ट्रभर शेकडो व्याख्याने.
च्पुरस्कार : १) भीमक्रांती पुरस्कार. २) सामाजिक कार्यासाठी भाई माधवराव बागल पुरस्कार. ३) कोल्हापूरभूषण पुरस्कार ४) शाहू पुरस्कार.
गोळ्यांनी विचार मरत नाहीत, हे मारेकऱ्यांनी ध्यानात घ्यावे. विरोधात विचार मांडणारी माणसे मारली जात आहेत. सरकारला विरोधी विचार नकोसे झालेत काय ? डॉ. दाभोलकरांच्या हत्येचा तपास वेळेवर लागला असता तर ही घटना घडलीच नसती. कॉम्रेड पानसरे यांचे मारेकरी सापडेपर्यंत पोलिसांनी ‘सद्रक्षणाय, खलनिग्रहणाय’ हे ब्रीदवाक्य वापरणे थांबवावे. डॉक्टरांच्या हत्येनंतर तेव्हाचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे देवेंद्र फडणवीस यांनी आता कोणत्या नैतिकतेच्या आधारे खुर्चीला चिकटून राहावे, याचा विचार करावा.
- डॉ. हमीद दाभोलकर,
अंधश्रद्धा निर्मूलन समिती
शब्दच सूचत नाहीत. पानसरे यांना मारणाऱ्या प्रवृत्तींच्या विरोधात लढण्यासाठी पुरोगामी शक्तींनी एकत्र येऊन लढण्यासाठी सज्ज व्हायला हवे. तरुण, कष्टकरी, कामगार, महिलांच्या आंदोलनात पानसरे सदैव आघाडीवर असत.
- किरण मोघे, ज्येष्ठ कम्युनिस्ट नेत्या
पानसरे यांचे हौतात्म्य वाया जाऊ देऊ नका, नवा भारत घडवणे याच ध्येयाने अण्णा आयुष्यभर झटले. देशातून धर्मांध शक्तींचे उच्चाटन करण्यासाठी देशभरातील कार्यकर्त्यांना एकत्र होण्याचे आवाहन मी करतो. या देशातून धर्मांध शक्तींचे उच्चाटन हीच कॉम्रेड अण्णांना खरी श्रद्धांजली आहे. त्यांच्यावरील भ्याड हल्ल्यामुळे देशभरातील कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संतापाची भावना आहे.
- भालचंद्र कांगो, ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते
गोडसे प्रवृत्तींनी डॉ. दाभोलकरांची हत्या केली. हिंदुत्ववाद्यांनी पानसरेंवर गोळ््या घातल्या. मात्र पुरोगामी विचार मरणार नाही. महाराष्ट्रातून हजारो-लाखो दाभोलकर, पानसरे तयार होतील.
- विश्वास उटगी, ज्येष्ठ कामगार नेते
आत्ताच आबांच्या निधनाच्या दु:खातून सावरत असतानाच पानसरे यांच्या निधनाच्या वृत्ताने मन सुन्न झाले आहे. पण आता सर्वांनी एकत्र येऊन अशा घटना थांबवायला हव्यात. महाराष्ट्राचे ऐक्य दाखवण्याची आता गरज आहे. ज्या शाहू महाराजांचे नाव घेऊन कोल्हापूरात दाखले दिले जातात, तेथे पानसरेंवर हल्ला होणे हे दुर्देवी आहे. त्यामुळे अशा धर्मांध शक्तींना वेळीच रोखण्यासाठी एकत्र येऊन पावले उचलायला हवीत.
- सुप्रिया सुळे,
खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस
शोषितांसाठी अखेरपर्यंत लढणारा पुरोगामी नेता महाराष्ट्राने गमावला आहे. त्यांच्या निधनामुळे झालेली चळवळीची हानी कधीही भरुन निघणार नाही. त्यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यातून ते बचावले व त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे आशादायक वृत्त आले असतानाच त्यांच्या निधनाची बातमी समजल्यावर धक्का बसला.
- रावसाहेब दानवे, प्रदेशाध्यक्ष, भाजपा
शोषित, दु:खी लोकांचे नेतृत्व करणारा, त्यांना आधार देणाऱ्या व्यक्तीवर सैतानी डोक्याची माणसेच हल्ला करू शकतात. हल्लेखोरांना पकडून कठोर शिक्षा होण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे.
- सुधीर मुनगंटीवार, अर्थमंत्री
छत्रपती शाहू महाराजांच्या भूमीत पुरोगामी विचारावर हल्ला होणे, हे धक्कादायक आहे. संपूर्ण आंबेडकरी जनतेच्या वतीने मी सरांना श्रद्धांजली वाहतो.
- रामदास आठवले, अध्यक्ष, आरपीआय
प्रिन्स शिवाजी बोर्डिंग नसतं, जर मला तिथं प्रवेश मिळाला नसता, तर आज मी जो कोणी आहे तसा झालो नसतो. कुठल्या तरी हॉटेलमध्ये कपबशा विसळीत बसलो असतो किंवा कुठे तरी शिपाईगिरी करत बसलो असतो. माझ्या जडणघडणीमध्ये अनेकांचे हातभार लागले, त्यात सर्वात मोठा हातभार त्या बोर्डिंगचा आहे. - अॅड. गोविंद पानसरे
सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नहीं,
मेरी कोशिश हैं कि ये सूरत बदलनी चाहिए
मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही,
हो कहीं भी आग लेकिन, आग लगनी चाहिए !