सातबारावरून जमीन झाली गायब
By Admin | Updated: September 20, 2016 01:51 IST2016-09-20T01:51:21+5:302016-09-20T01:51:21+5:30
नर्मदाबाई अर्जुन शेळके या महिला शेतकऱ्याने सन १९९४ ते १९९८ साली घेतलेली पाच एकर शेतजमीनच सातबाऱ्यावरून गायब झाली आहे.

सातबारावरून जमीन झाली गायब
बारामती : तालुक्यातील सुपानजीक पानसरेवाडी येथे नर्मदाबाई अर्जुन शेळके या महिला शेतकऱ्याने सन १९९४ ते १९९८ साली घेतलेली पाच एकर शेतजमीनच सातबाऱ्यावरून गायब झाली आहे. यामुळे तालुक्यात हा चर्चेचा विषय बनला आहे. याबाबत वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
तालुक्यातील सुपानजीक पानसरेवाडी येथील नर्मदाबाई शेळके यांनी १८ जुलै १९९४ साली गट क्र. ९०२ मधील ८० आर तसेच त्याच गटातून भगवान नानासाहेब शेळके यांनी ८० आर क्षेत्र खरेदी केले होते. त्यानंतर ६ जुलै १९९८ रोजी ४० आर शेतजमीन गुलाबराव पानसरे यांच्याकडून नर्मदाबाई यांनी खरेदीखताने विकत घेतली होती. खरेदी केल्यापासून शेळके हे शेतजमीन वहिवाटत होते. तसेच अजितदादा विविध कार्यकारी सोसायटीकडून ते नियमित कर्जही काढत होते.
मात्र, खरीप हंगामातील पीककर्ज काढण्यासाठी ते सातबारा आणण्यासाठी सुपा येथे गेले असता त्यांचे नाव सातबाऱ्यातून गायब झाले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यामुळे त्यांची जमीनच गायब झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे.
जमीन विकत देणाऱ्या पानसरे कुटुंबीयातील दत्तात्रय पानसरे
व वसंत पानसरे यांचा जमीनवाटपाचा दावा न्यायालयात दाखल केला होता. याबाबत शेळके अनभिज्ञ होते.
येथील जमिनीचे भाव गगनाला भिडलेले असल्याने याचा पानसरे
यांनी फायदा उचलत तहसीलदार, भूमी अभिलेख, मंडल अधिकारी व तलाठी यांना हाताशी धरून
आपणावर अन्याय केला असल्याचा आरोप नर्मदा शेळके यांनी केला. (वार्ताहर)
पानसरे दोन्ही भावांमध्ये गेल्या २० वर्षांपासून जमीनवाटपावरून
कोर्टात वाद सुरू होता. दरम्यानच्या काळात दोघांनी गट क्र. ९०२ मधील जमिनीची विक्री केली आहे. मात्र, न्यायालयाच्या अंतिम
निर्णयावेळेस सुधारित सातबारा न दिल्याने नर्मदा शेळके यांचे नाव कमी झाले आहे. नायब तहसीलदारांनी जमीनवाटप केले आहे. मी केवळ सातबाऱ्यावर इफेक्ट दिला आहे.
- आर. आर. जगदाळे, तलाठी, सुपे