आनंदवन’साठी कोल्हापूरकरांचा ‘आहेर’
By Admin | Updated: September 4, 2015 22:49 IST2015-09-04T22:49:27+5:302015-09-04T22:49:27+5:30
३०० पेट्या कपडे रवाना : चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

आनंदवन’साठी कोल्हापूरकरांचा ‘आहेर’
कोल्हापूर : येथील जिल्हा परिषदेने ‘जुने कपडे देऊया, आनंदवन फुलवूया’ अशी भावनिक हाक देत संकलित केलेल्या कपड्यांच्या ‘आहेराचा ट्रक’ शुक्रवारी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते ‘आनंदवन’कडे रवाना करण्यात आला. कपड्यांच्या ३०० पेट्यांनी भरलेला ट्रक पाठविण्यात आला. यामुळे आनंदवनातील कुष्ठरोग्यांना कोल्हापूरकरांच्या मायेची ऊब मिळणार आहे.
वर्धा जिल्ह्णातील वरोड्याजवळ बाबा आमटे यांनी १९५२ साली ‘आनंदवन’ची स्थापना केली. सध्या ते साडेतीन हजार कुष्ठरोग्यांचे घर बनले आहे. तेथील कुष्ठरोगी लोकांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार शहर, परिसर, जिल्ह्णातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. संकलित झालेले कपडे रवाना करण्याच्या कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री पाटील म्हणाले, मी नेहमी गरीब, वंचितांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. वाढदिवसानिमित्त मी हार, तुरे, पुष्पगुच्छांऐवजी रद्दी स्वीकारतो. यातून तीन लाख रुपये गोळा झाले आहेत. हे तीन लाख आणि माझ्या फंडातील तीन लाख असे सहा लाख रुपये येथील ‘सावली’ संस्थेला देणार आहे. जिल्हा परिषदेने आनंदवनासाठी कपडे संकलित करण्याचा राबविलेला उपक्रम कौतुकास्पद आहे. यापुढेही असेच उपक्रम सुरू ठेवावेत. समाजोपयोगी कार्यक्रमांना सरकार आणि जिल्हा प्रशासनाच्यावतीने पाठबळ दिले जाईल.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार म्हणाले, अनेक कुटुंबांकडे औषधे शिल्लक राहतात. चांगल्या स्थितीतील आणि मुदतीमध्ये असलेली औषधे संकलित करून गरीब, गरजूंना प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने देण्याचा उपक्रम राबविण्यासाठी जिल्हा परिषद पुढाकार घेणार आहे. सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी रक्तदान शिबिरही आयोजित करण्याचा मानस आहे.
चंद्रपूरचे जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले, राज्यात चांगले काम करणारी जिल्हा परिषद म्हणून कोल्हापूरचा लौकिक आहे. यापूर्वीही जिल्हा परिषदेने राबविलेले अनेक उपक्रम राज्यातील अन्य जिल्ह्यांत राबविले आहेत. ‘आनंदवन’चे कामही चांगले आहे.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष विमल पाटील, उपाध्यक्ष शशिकांत खोत, महिला व बालकल्याण सभापती ज्योती पाटील, सभापती किरण कांबळे, अभिजित तायशेटे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
( प्रतिनिधी )
साटलोटं...
डॉक्टर आणि औषध दुकानदार यांच्यात सध्या साटलोटे दिसते. यातून डॉक्टर रुग्णांना उपचारावेळी भरमसाट औषधे लिहून देत असतात. आजार बरा झाल्यानंतर रुग्णांची अनेक औषधे बंद होतात किंवा बंद केली जातात. पण आणलेली औषधे तशीच घरात शिल्लक राहतात. ती संकलित करून गरजंूना दिल्यास त्याचा फायदा होईल, असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले