कोल्हापूर-राजापूर कनेक्शन!

By Admin | Updated: January 13, 2015 00:16 IST2015-01-12T22:26:29+5:302015-01-13T00:16:48+5:30

मध्य रेल्वेचा प्रस्ताव : नवीन अर्थसंकल्पात होणार नवीन नातं तयार

Kolhapur-Rajapur connection! | कोल्हापूर-राजापूर कनेक्शन!

कोल्हापूर-राजापूर कनेक्शन!

रत्नागिरी : कोल्हापूर ते राजापूर असा कोकण रेल्वेमार्गाला जोडणारा ११२ किलोमीटरचा नवीन रेल्वेमार्ग उभारण्याबाबतचा प्रस्ताव मध्य रेल्वेच्या पुणे विभागातर्फे रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आला आहे. हे बोर्ड केंद्रीय रेल्वे मंत्रालयांतर्गत असून, प्रस्तावित नवीन मार्गासाठी ३,१६८.१० कोटी रुपये खर्र्च अपेक्षित आहे. याबाबत तपशीलवार चर्चा झाली असून, २१ फेबु्रवारी २०१५ रोजी संसद सभागृहात सादर होणाऱ्या रेल्वे अर्थसंकल्पात हा प्रस्ताव समाविष्ट होण्याची शक्यता आहे.
कऱ्हाड-चिपळूण या नवीन रेल्वेमार्गाबाबत हालचाली सुरू असताना कोल्हापूर-राजापूर हा नवे रेल्वेमार्ग अस्तित्वात येण्याची माहिती उपलब्ध झाली आहे. विशेष म्हणजे याबाबतचा प्रस्तावही मध्य रेल्वेने रेल्वे मंत्रालयाकडे पाठविला आहे. कोल्हापूर-राजापूर प्रस्तावित रेल्वेमार्ग अस्तित्वात आल्यास कोल्हापूर-कोकण अधिक जवळ येणार आहे, व्यावसायिक उलाढाल वाढणार आहे. कोल्हापुरातून थेट जयगड बंदरापर्यंत कारखान्यांमधील साखर, इचलकरंजीतील गारमेंट यांची वाहतूक करणेही सोपे जाणार आहे. या प्रस्तावाबाबत पुणे विभागाचे उपमुख्य अभियंता एस. पी. म्हस्के यांनी प्रसारमाध्यमांनाही माहिती दिली आहे. त्यानुसार या प्रस्तावात प्रकल्पासाठी अर्थपुरवठा कसा होईल, त्यातील गुंतवणुकीतून मिळणाऱ्या लाभाचा परतावा कसा असेल, याबाबत विविध स्तरावर कशी चर्चा झाली आहे, याचीही माहिती देण्यात आली आहे.
या प्रस्तावित कोल्हापूर-राजापूर रेल्वेमार्गामुळे कोल्हापूर-जयगड बंदर (रत्नागिरी) हे कोकण रेल्वेच्या माध्यमातून जोडले जाणार आहे. त्यामुळे कोल्हापूरमधील अनेक साखर कारखान्यांतील साखर, धान्य वाहतूक थेट जयगड बंदरापर्यंत शक्य होणार आहे. इचलकरंजी येथील कापड निर्मिती उद्योगालाही याचा लाभ होणार आहे. इचलकरंजीत जागतिक मानांकनप्राप्त ५० गारमेंट कंपन्या असून, कापड उत्पादक व कापड व्यापारीही मोठ्या प्रमाणात आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Kolhapur-Rajapur connection!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.