कोल्हापूर बनतंय ‘हॉटेलिंग हब’
By Admin | Updated: May 7, 2017 04:35 IST2017-05-07T04:35:59+5:302017-05-07T04:35:59+5:30
कोल्हापूर : पुण्यानंतर मराठमोळ्या संस्कृतीचे शहर म्हणून कोल्हापूरचे नाव घेतले जाते. अंबाबाई, जोतिबा या धार्मिक

कोल्हापूर बनतंय ‘हॉटेलिंग हब’
इंदुमती गणेश/ लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : पुण्यानंतर मराठमोळ्या संस्कृतीचे शहर म्हणून कोल्हापूरचे नाव घेतले जाते. अंबाबाई, जोतिबा या धार्मिक अधिष्ठानांसह ताराराणी, शाहू महाराजांचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या शहरात रुचकर जेवण अल्प दरात मिळत असल्याने गेल्या काही वर्षांपासून कोल्हापूर हे ‘हॉटेलिंग हब’ म्हणून पर्यटकांच्या पसंतीस उतरत आहे.
साडेतीन शक्तिपीठांतील प्रमुख स्थान असलेल्या अंबाबाई मंदिरामुळे गेल्या पाच-सहा वर्षांपासून कोल्हापूरला भाविकांचा आणि पर्यायाने पर्यटकांचा ओघ वाढला आहे. वर्षाला किमान ४० लाख भाविक कोल्हापुरात देवीच्या दर्शनासाठी येतात.
कोल्हापूर शहरातील पर्यटन स्थळे पाहिल्यानंतर पर्यटकांची पावले वळतात, ती पोटपूजेसाठी. पर्यटनासाठी आपण अन्य कोणत्याही शहरात गेलो की बऱ्याचवेळा जेवणाची आबाळ होत असते. कोल्हापूर मात्र याला अपवाद आहे. अन्य वैशिष्ट्यांप्रमाणे तांबडा-पांढरा रस्सा, अस्सल खवय्यांचे आणि रुचकर जेवण मिळणारे शहर म्हणूनही कोल्हापूरची ख्याती आहे.
केवळ अंबाबाई मंदिराच्या बाह्य आणि शहराच्या मध्यवर्ती परिसरात सातशे लहान-मोठी हॉटेल्स आहेत आणि त्यापेक्षा जास्त संख्येने घरगुती खानावळी आहेत. याशिवाय रंकाळा चौपाटी, केशवराव भोसले नाट्यगृहाजवळची खाऊगल्ली, राजारामपुरी अशा ठरावीक ठिकाणी जिभेचे चोचले पुरविणारे अनेक पदार्थ मिळतात.
कोल्हापुरी नावाचे जगभरात ब्रँडिंग
कोल्हापूरसह अन्य कोणत्याही शहरात जा. तेथील प्रत्येक हॉटेलमध्ये कोल्हापुरी नावाने चार-पाच डिशेस असतात. स्वतंत्र कोल्हापुरी खाद्यपदार्थांची यादी मेनूकार्डमध्ये असते. पनीर, काजू मसाला, कोफ्ता, रोटीसारख्या पंजाबी डिशेसना पर्यटकांकडून अधिक पसंती दिली जाते.
वडापाव, मिसळ!
जेवणाबरोबरच कोल्हापुरात नाष्ट्याचे पदार्थही तितकेच रुचकर बनवले जातात. वडापाव, झणझणीत मिसळ, कटवडा अशा अस्सल कोल्हापुरी खाद्यपदार्थांची चव जिभेवर रेंगाळते. दहा ते पंधरा रुपयांत पोहे, उपमा, आप्पे, इडली यांसारखे पदार्थ भरपेट खाता येतात.
खानावळींमध्ये वेटिंग : पंचतारांकित हॉटेल्ससह अनेक मोठ्या हॉटेलमध्ये पर्यटकांची गर्दी असली तरी येथील पेठांमध्ये आणि गल्लीबोळांमध्ये असलेल्या खानावळींनी तांबड्या-पांढऱ्या रश्शासह जेवणाचे विविध प्रकार जगभर पोहोचविले आहेत. एकट्या मिरजकर तिकटी ते नंगीवली चौक या परिसरात सव्वाशेहून अधिक घरगुती खानावळी आहेत. खास या खानावळींमध्ये जेवण्यासाठी पुण्यासारख्या शहरातून लोक येतात.
चुलीवरचे पिठले, भाकरी व मिरचीचा ठेचा आहेच. इथे आलेला पर्यटक कधीच जेवण चांगले नाही म्हणून अर्धपोटी जात नाही. त्यामुळेच देवीच्या दर्शनाच्या निमित्ताने कोल्हापुरात आलेला पर्यटक खाद्यभ्रमंती करूनच येथून तृप्त मनाने बाहेर पडतो. त्यामुळे कोल्हापूरच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील विकास आराखड्यात या खाद्यसंस्कृती आणि हॉटेलिंग हबच्या दृष्टीनेही पावले उचलावी लागणार आहेत.
कोल्हापूरची खाद्यसंस्कृती पूर्वीपासूनच चांगली आहे. नाष्टा, जेवणाच्या पदार्थांचे असंख्य प्रकार, अल्प दर आणि वाढत्या पर्यटनामुळे ती जगभर पोहोचले आहेत. घरगुती खानावळींचाही मोलाचा वाटा आहे. शहरविकासाच्या दृष्टीने रेल्वे स्थानक, बस स्थानक अशा परिसरात ‘फूड कोर्ट’सारखी संकल्पना राबविण्यात यावी. - उज्ज्वल नागेशकर
(हॉटेल व्यवसायिक)