आॅलवेज स्ट्रगल; घेणार का दखल?
By Admin | Updated: July 17, 2014 01:11 IST2014-07-17T01:11:42+5:302014-07-17T01:11:42+5:30
दरवर्षी पावसाळा येतो, ठिकठिकाणी पाणी साचते, नाल्या तुंबतात, रस्त्यांना तलावाचे स्वरूप येते. पुलाखाली साचलेल्या पाण्यामुळे वाहतूक ठप्प होते. खड्डे उघडे पडतात. नागरिकांना होणाऱ्या त्रासाची एक दिवस

आॅलवेज स्ट्रगल; घेणार का दखल?
नेमेची येतो पावसाळा अन् दुर्दशाही : समस्येवर कायम तोडगा नाही
नागपूर : दरवर्षी पावसाळा येतो, ठिकठिकाणी पाणी साचते, नाल्या तुंबतात, रस्त्यांना तलावाचे स्वरूप येते. पुलाखाली साचलेल्या पाण्यामुळे वाहतूक ठप्प होते. खड्डे उघडे पडतात. नागरिकांना होणाऱ्या त्रासाची एक दिवस चर्चा होते. पाणी ओसरले की स्थिती पुन्हा जैसे-थे. नागरी सुविधांसाठी महापालिकेकडे दरवर्षी कर भरणाऱ्या नागरिकांची या त्रासापासून कायमस्वरूपी सुटका व्हावी याकडे कोणीच लक्ष देत नाही. शहरात अनेक अशी ठिकाणे आहेत की तेथे दरवर्षी पाणी साचते. जबाबदार यंत्रणा परस्परांकडे बोट दाखवितात. पावसाळा संपला की पुढच्या पावसाळ्यापर्यंत याबाबत कोणी अवाक्षरही काढत नाही. निवडणुका आल्या की कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांच्या घोषणा केल्या जातात. आंतरराष्ट्रीय शहराची स्वप्ने दाखविली जातात. प्रत्यक्षात होत काहीच नाही.
वर्धामार्गाला जोडणाऱ्या वळण मार्गावर असणारा हा पूल दरवर्षी तेथे साचणाऱ्या पाण्यामुळे नागरिकांच्या डोकेदुखीसाठी कारणीभूत ठरतो. पूर्वी येथे अपघात व्हायचे आता पावसाच्या पाण्याची समस्या आहे. थोडा जास्त पाऊस झाला तरी गुडघाभर पाणी येथे साचते व त्यामुळे पुलाखालून जाणारी वाहतूकच ठप्प पडते. पूल खोलगट भागात असल्याने अपघाताचाही धोका संभवतो.
शहरातील बाजारपेठेत असणारा हा जुना पूल आहे. जुन्या आणि नवीन नागपूरला हा पूल जोडतो. महापालिकेच्या फुटलेल्या जलवाहिनीतून वाहणाऱ्या पाण्यामुळे पुलाखाली बाराही महिने ओलावा असतो. पावसाळ्यात तर येथे तळे साचते. पुलाच्या आजूबाजूचा भाग खोलगट असल्याने हा परिसरच जलमय होतो. रेल्वे रुळावरून खाली येणारे तसेच इतर भागातून वाहत येणारे पाणी ही सर्वात मोठी समस्या आहे.
नागनदीला खेटून असणाऱ्या या पुलाची अवस्था पावसाळ्यात वेगळी राहात नाही. विशेष म्हणजे खोलगट भाग असल्याने येथे पावसाळ्यात अपघात होण्याची स्थिती आहे. अनेक वर्षांपासूनची ही समस्या आहे. नागनदीतील पाणी रस्त्यावर येते. याशिवाय उतार असल्याने इतर भागातील पाणी येथे गोळा होते. वाहने हाती घेऊन ढकलत नेण्यापलीकडे पावसाळ्यात येथे पर्याय उरत नाही.