स्वतंत्र लढलो म्हणून ताकद कळली!

By Admin | Updated: May 24, 2015 01:51 IST2015-05-24T01:51:41+5:302015-05-24T01:51:41+5:30

तीन दिवसांत सर्व २८८ मतदारसंघांत आम्ही उमेदवार उभे केले व तब्बल १२० जागा आम्ही जिंकू शकलो. स्वतंत्र लढायचा निर्णय झाला नसता तर ही ताकद कळली नसती,

Know the strength as an independent fight! | स्वतंत्र लढलो म्हणून ताकद कळली!

स्वतंत्र लढलो म्हणून ताकद कळली!

मुख्यमंत्री : जनतेचा विश्वासघात होऊ देणार नाही
स्वर्गीय गोपीनाथ मुंडे नगरी (कोल्हापूर) : विधानसभा निवडणुकीत शिवसेनेबरोबरची युती तुटेल असे आम्हाला वाटले नव्हते; परंतु दुर्दैवाने तसे घडले व तीन दिवसांत सर्व २८८ मतदारसंघांत आम्ही उमेदवार उभे केले व तब्बल १२० जागा आम्ही जिंकू शकलो. स्वतंत्र लढायचा निर्णय झाला नसता तर ही ताकद कळली नसती, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी सांगितले.
भाजपा राज्य कार्यकारिणीच्या उद्घाटन समारंभात मुख्यमंत्री बोलत होते. अध्यक्षस्थानी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा होते. राज्यात १९९०नंतर कोणत्याच पक्षाला शंभरापेक्षा जास्त जागा मिळाल्या नव्हत्या; परंतु भाजपाने त्या स्वबळावर जिंकून दाखविल्या. हनुमानाला त्याची ताकद समजली नव्हती. त्याने उड्डाण घेतले तर तो सूर्याला कवेत घेऊ शकतो, असा आत्मविश्वास आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्या नेतृत्वामुळे मिळाला, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
काही तरी होईल आणि राज्यातील भाजपा-शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळेल, अशी काही जण वाटच बघत आहेत, परंतु माझ्या सरकारला कोणताही धोका नाही. त्यामुळे सरकार कोसळण्याच्या भ्रमात कुणी राहू नये, असा टोला फडणवीस यांनी लगावला. भाजपाच्या सरकारबद्दल लोकांच्या आशा-आकांक्षा वाढल्या आहेत. ‘पारदर्शी कारभार’ हेच आमचे सूत्र असून, जनतेचा विश्वासघात होऊ देणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी या वेळी दिली.
देशात व राज्यात भाजपाला मिळत असलेले यश काँग्रेसवाल्यांना सहन होत नाही. त्यामुळेच पंतप्रधान मोदी यांनी काही केले नाही,
अशी ओरड ते करीत आहेत. सत्तेवर येताना भाजपाने दिलेल्यांपैकी ४४ आश्वासने फडणवीस सरकारने पूर्ण केली आहेत.
भाजपाचे सरकार हे शेतकरीविरोधी आहे, असा प्रचार
काँग्रेसवाले करीत आहेत; परंतु ते खोटे असल्याचे जनतेला पटवून देऊ, असे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितले. प्रारंभी भाजपाच्या वाटचालीवर दृष्टिक्षेप टाकणारी ‘झेप’ ही चित्रफीत दाखविण्यात आली. (प्रतिनिधी)

च्सशक्त भाजपा... सशक्त भारत... व झेप घे...असा घोषणा देणारे फलक अधिवेशनस्थळी लावण्यात आले होते. अधिवेशनस्थळी छत्रपती शिवाजी महाराज, अहिल्याबाई होळकर, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा लावण्यात आल्या होत्या.
च्भाजपाला या थोर महापुरुषांचा विसर पडल्याची टीका शुक्रवारी
राष्ट्रवादी काँग्रेसने केली होती. पक्षाचे दिवंगत नेते श्यामाप्रसाद मुखर्जी, दीनदयाळ उपाध्याय, प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे यांच्याही प्रतिमा व्यासपीठावर होत्या.

जावयाच्या हस्ते...
कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात जावयाच्या हस्ते केली जाते, म्हणून कोल्हापुरातील अधिवेशनास आम्ही राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना बोलावले, असे रावसाहेब दानवे यांनी सांगताच सभागृहात हशा पसरला. शहा हे कोल्हापूरचे जावई आहेत.
...पण एकही टाळी नाही
नाशिक जिल्ह्यातील येवलाचे माजी आमदार कल्याण पाटील यांनी या वेळी भाजपामध्ये प्रवेश केला. दानवे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले; परंतु या वेळी सभागृहात एकही टाळी वाजली नाही. पक्षाला आता अशा माजी आमदारांची फारशी गरज नसल्याची प्रतिक्रिया तिथे उमटली.

पानसरे यांना श्रद्धांजली...
कार्यकारिणीच्या बैठकीच्या उद्घाटन समारंभात ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांच्याशिवाय देश व राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांना व नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत्यू पावलेल्यांनाही श्रद्धांजली वाहण्यात आली.

 

Web Title: Know the strength as an independent fight!