गांधींचे विचार लोकांपर्यंत पोहोचवणाऱ्यांचीच हत्या
By Admin | Updated: November 22, 2015 02:15 IST2015-11-22T02:15:53+5:302015-11-22T02:15:53+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशात महात्मा गांधींचे विचार मांडत आहेत़ परंतु देशात मात्र गांधींचे विचार लोकांपर्यंत पोहोचवणाऱ्या विचारांची हत्या केली जात आहे. कॉ़ गोविंद पानसरे

गांधींचे विचार लोकांपर्यंत पोहोचवणाऱ्यांचीच हत्या
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशात महात्मा गांधींचे विचार मांडत आहेत़ परंतु देशात मात्र गांधींचे विचार लोकांपर्यंत पोहोचवणाऱ्या विचारांची हत्या केली जात आहे. कॉ़ गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासात आतापर्यंत समीर गायकवाड या एकाच संशयिताला अटक झाली आहे़ त्यानंतर तपासाला विरामचिन्ह लावण्यात आले आहे. यावरून सरकार या हत्यांंचा तपास गांभीर्याने करत नाही, असा आरोप हमीद दाभोलकर यांनी केला़
हमीद दाभोलकर म्हणाले, सीबीआय व सरकार यांसारख्या सर्वोच्च यंत्रणा गांभीर्याने काम करीत नाहीत. सध्याचे शासन समाजात बदलाचे आश्वासन देऊन सत्तेत आले आहे; परंतु कोणतेही चांगले बदल झालेले नाहीत. उलट या प्रकरणांकडे दुर्लक्ष केले जात आहे. फ्रान्समधील हल्ल्याचे मारेकरी दोन दिवसांत सापडले. परंतु येथे दोन-अडीच वर्षांपासून दाभोलकरांचे मारेकरी सापडत नाहीत.
शैला दाभोलकर म्हणाल्या, दाभोलकर यांच्या हत्येच्या तपासाला सरकारमुळे गती येत नाही. संविधानाच्या चौकटीमध्ये राहून आम्ही आंदोलन सुरू ठेवणार आहोत. या चळवळीला नागरिकांची हवी तेवढी साथ अद्याप मिळालेली नाही. तरुण वर्ग मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरला तर यंत्रणेवर नक्कीच दबाव निर्माण होईल. (प्रतिनिधी)
वर्षभरात मोदींची नाही मिळाली वेळ
डॉ़ दाभोलकर यांच्या हत्येच्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळ घेण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत करीत आहे़ मात्र, एक वर्षापासून आम्ही सातत्याने पाठपुरावा करूनही वेळ मिळालेली नाही़ यावरून दाभोलकर यांच्या हत्येच्या तपासाला प्राधान्य दिले जात नसल्याचे दिसून येते, असे हमीद दाभोलकर यांनी सांगितले़