खापर मेरिटाइम बोर्डावर !
By Admin | Updated: June 14, 2014 04:41 IST2014-06-14T04:41:04+5:302014-06-14T04:41:04+5:30
मेरिटाइम बोर्डाच्या हट्टाने व ‘सीआरझेड’चे नियम डावलून समुद्रकिनाऱ्यावर टाकलेल्या भरावामुळे मुंबईतील अनेक भागांत समुद्राच्या भरतीचे पाणी शिरल्याचे म्हणत महापालिकेने मेरिटाइम बोर्डावर खापर फोडले आहे.

खापर मेरिटाइम बोर्डावर !
मुंबई : मेरिटाइम बोर्डाच्या हट्टाने व ‘सीआरझेड’चे नियम डावलून समुद्रकिनाऱ्यावर टाकलेल्या भरावामुळे मुंबईतील अनेक भागांत समुद्राच्या भरतीचे पाणी शिरल्याचे म्हणत महापालिकेने मेरिटाइम बोर्डावर खापर फोडले आहे.
मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर गुरुवारी धडकलेल्या लाटांनी अक्षरश: हाहाकार केला. या पार्श्वभूमीवर या सर्व घटनेला ‘सीआरझेड’चे नियम डावलून मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांवर भरणी टाकून त्यावर ‘वॉक-वे’ तयार करणारे व अनेक ठिकाणी भरणी टाकून त्यावर ट्रायपॉड टाकणारे महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीतील मेरिटाइम बोर्ड जबाबदार आहे, असे परखड प्रतिपादन महापौर सुनील प्रभू यांनी शुक्रवारी केले आहे.
समुद्राच्या भरतीचे पाणी माहीम, वरळी, दादर आदी भागांतील वस्त्यांमध्ये शिरण्याच्या घटनेबाबत एक विशेष उच्चस्तरीय समिती नेमण्याचे व दोषींवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश प्रभू यांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत.
महापालिकेला कोणत्याही प्रकारे विश्वासात न घेता व ‘सीआरझेड’चे नियम डावलून माहीम, दादर व वरळी भागातील स्थानिक आमदारांच्या हट्टाला बळी पडत महाराष्ट्र शासनाच्या मेरिटाइम बोर्डाद्वारे मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांवर भरणी टाकून त्यावर ‘वॉक-वे’ तयार केले आहेत. तर अनेक ठिकाणी भरणी टाकून त्यावर ट्रायपॉड टाकण्यात आले आहेत. ज्यामुळे पर्यावरणाचा आणि निसर्गाचा समतोल बिघडून समुद्राचे पाणी रस्त्यावर व वस्त्यांमध्ये शिरत आहे. याची उच्चस्तरीय चौकशी होणे गरजेचे आहे, असेही प्रभू यांनी सांगितले. (प्रतिनिधी)