खडसेंचा अहंकार आडवा आला!
By Admin | Updated: October 4, 2014 01:58 IST2014-10-04T01:58:28+5:302014-10-04T01:58:28+5:30
द्रोपदीच्या वस्त्रहरणामुळे महाभारत घडले होते. मात्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी भाजपात आणलेल्या संजय सावकारे यांना भुसावळची जागा सोडण्यास शिवसेनेने नकार दिला.

खडसेंचा अहंकार आडवा आला!
>द्रोपदीच्या वस्त्रहरणामुळे महाभारत घडले होते. मात्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी भाजपात आणलेल्या संजय सावकारे यांना भुसावळची जागा सोडण्यास शिवसेनेने नकार दिला. खडसे यांचा अहंकार येथे आडवा आला. आपण सावकारेला भाजपात घेतले आणि त्याची जागा सुटत नाही म्हणजे काय? आपले वस्त्रहरण होऊ नये याकरिता खडसे यांनी शिवसेनेबरोबरची युती तोडण्याचा आग्रह धरला आणि महायुतीमधील महाभारत घडले, अशा शब्दांत शिवसेनेचे विधान परिषदेतील गटनेते दिवाकर रावते यांनी टीका केली.
प्रश्न : शिवसेनेची भाजपाबरोबरची युती ‘मिशन 15क् मुळे तुटली हे मान्य आहे का?
रावते : ‘मिशन 15क् मुळे युती तुटली हे मान्य करण्याचा प्रश्नच येत नाही. युती टिकवण्याकरिता उद्धव यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. युतीचे महायुतीमध्ये रुपांतर झाल्यामुळे दोन्ही प्रमुख पक्षांनी त्याग करण्याची भूमिका ठेवायला हवी होती. भाजपाचे दिल्लीपतीश्वर ओम माथूर हे गणित विषयातील डॉक्टरेट आहेत की काय ते मला माहित नाही. पण जागावाटपाचा प्रस्ताव सर्वप्रथम घेऊन आले त्याचवेळी मित्रपक्षांना 18 जागा द्यायच्या व शिवसेना-भाजपाने प्रत्येकी 135 जागा लढवायच्या असे सांगत होते. त्यानंतर ‘काँग्रेसमुक्त भारत अशी घोषणा देणारे अमित शहा पहिल्याच सभेत ‘भाजपायुक्त महाराष्ट्रचे नारे देऊ लागले. त्यानंतर भाजपाची मंडळी शिवसेना 145 व भाजपा 13क् जागांचा फॉम्यरुला सांगू लागले. त्यामुळे अखेरीस उद्धव यांनी पक्षाच्या कार्यकारिणीत शिवसेना 151 जागा लढेल व मित्रपक्षांच्या जागा देऊन भाजपाच्या घटलेल्या जागांची भरपाई करील, असा प्रस्ताव मांडला. त्यानुसार भाजपाला 119 जागा मिळत होत्या. परंतु भाजपा 13क् जागांच्या खाली येत नव्हती. शिवसेनेने 18 जागांचा त्याग केल्यावरही भाजपा काही सोडायला तयार नव्हती. मग मित्रपक्षांना केवळ सात जागा देण्याचा प्रस्ताव भाजपानेच पुढे आणला. जागावाटपाच्या वाटाघाटीत वाटा आमचा आणि घाटा शिवसेनेचा असे भाजपाचे सुरु होते व त्याचे एकमेव कारण नरेंद्र मोदी लोकसभा जिंकले आहेत. अगदी अखेरीस शिवसेनेने आपल्या वाटय़ाच्या 3 जागांवर भाजपा व मित्रपक्षांचे उमेदवार उभे करण्याचा परंतु धनुष्यबाणाचे चिन्ह घेण्याचा प्रस्ताव दिला. हाच प्रस्ताव घेऊन विनोद तावडे हे खडसेंना भेटायला गेले. मग भाजपाने भुसावळसह चार जागांचा आग्रह धरला. तेथे शिवसेनेकडे सक्षम उमेदवार असल्याने त्या जागा सोडण्यास नकार दिला. येथे खडसेंचा अहंकार आडवा आला आणि युती तुटली.
प्रश्न : स्वाभिमानी व रासपा यांच्याबरोबरच्या शिवसेनेच्या वाटाघाटी यशस्वी झाल्या होत्या तरी ते का दुरावले?
रावते : या प्रश्नाचे उत्तर राजू शेट्टी यांनी द्यायला हवे. शेट्टी हे प्रलोभनाला न भूलणारे व्यक्ती आहेत. परंतु केंद्राच्या सत्तेतून काही करता येईल याकरिता भाजपासोबत गेले असतील. महादेव जानकर यांचे गोपीनाथ मुंडे यांच्याशी घनिष्ट संबंध असल्याने ते भाजपासोबत राहिले. रामदास आठवले यांना केंद्रातील मंत्रीपद हवे होते. हवेतर अनंत गिते यांचे मंत्रीपद काढून घेऊन तुम्हाला देऊ शकतो असे आठवले यांना उद्धव यांनी सांगितले होते. अन्यथा शिवसेनेची सत्ता आल्यास उपमुख्यमंत्रीपद व 15 जागा सोडण्याची तयारी दाखवली होती.
प्रश्न- शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपदाचा सक्षम उमेदवार कुठे आहे?
रावते : उद्धव ठाकरे हेच शिवसेनेचे मुख्यमंत्रीपदाचे सक्षम उमेदवार आहेत. आमच्याकडे उद्धव यांचा चेहरा आहे, काँग्रेसकडे पृथ्वीराज चव्हाण तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे अजित पवार यांचा चेहरा आहे. भाजपाकडे मुख्यमंत्रीपदाचा कोणता चेहरा आहे? भाजपात तावडेंना कुणाला तरी तुरुंगात टाकण्याकरिता मुख्यमंत्री व्हायचे आहे तर फडणवीस यांना अन्य कशाकरिता तरी मुख्यमंत्री व्हायचे आहे. केंद्रात शरद पवार यांना कृषिमंत्री तर महाराष्ट्रात अजित पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याकरिता भाजपाने युती तोडण्याची घोषणा केली व अध्र्या तासात राष्ट्रवादीने आघाडी तोडण्याची घोषणा केली. भाजपा व राष्ट्रवादीची छुपी युती असल्याचेच हे प्रतिक आहे.
युतीची जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असताना आम्हा शिवसेनेच्या नेत्यांना एका खोलीत दोन तास कोंडून भाजपाचे नेते जेव्हा निघाले तेव्हा शिवसेनेच्या नव्या प्रस्तावावर चर्चा करण्याकरिता आम्ही खडसे यांच्या बंगल्यावर जात आहोत, असे त्यांनी जाहीर केले. त्यानंतर खडसे यांनी महायुती तुटल्याची घोषणा केलेले आम्ही वाहिन्यांवर पाहिले.
निकालानंतर सेना-भाजपा सत्ता स्थापनेकरिता एकत्र येण्याची शक्यता आहे का?
शिवसेना आपले ‘मिशन 15क्
पूर्ण करील. सध्या हा विचारही शिवसेनेच्या डोक्यात नाही. भाजपाने युती नव्हे तर हिंदुत्वाची नाळ तोडली आहे. त्यामुळे कुठलीही स्वाभिमानी व्यक्ती शिवसेनेलाच विजयी करील. आमच्यासोबत अन्य पक्षातून आलेल्या काही निष्कलंक व्यक्तींना घेऊन शिवसेना सरकार स्थापन करील.
शरद पवार यांना केंद्रात कृषिमंत्री तर अजित पवार यांना महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री करण्याकरिता भाजपाने शिवसेनेसोबतची युती तोडली आणि अध्र्या तासात राष्ट्रवादीने काँग्रेसची आघाडी संपुष्टात आणली. हा भाजपा व राष्ट्रवादीच्या छुप्या युतीचाच दाखला आहे. - दिवाकर रावते
संदीप प्रधान