केडीएमटीत कंत्राटी भरती
By Admin | Updated: July 1, 2016 03:40 IST2016-07-01T03:40:44+5:302016-07-01T03:40:44+5:30
परिवहन उपक्रमात दाखल झालेल्या ६० बस चालकांअभावी धूळखात पडून आहेत.

केडीएमटीत कंत्राटी भरती
कल्याण : परिवहन उपक्रमात दाखल झालेल्या ६० बस चालकांअभावी धूळखात पडून आहेत. त्यामुळे ‘ठोक पगारी तत्त्वावर’ चालक व वाहकांची भरती करण्याचा ठराव केडीएमटीने राज्य सरकारकडे पाठवला होता. मात्र, तो फेटाळण्यात आल्याने आता कंत्राटी पद्धतीवर चालक-वाहक नेमण्याच्या प्रस्तावाला गुरुवारच्या परिवहन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान अभियानांतर्गत केडीएमटी उपक्रमात १८५ बस उपलब्ध होणार आहेत. यातील १० व्होल्वो आणि उर्वरित ६० बस आॅगस्ट २०१५ मध्ये दाखल झाल्या आहेत. १० व्होल्वो या रस्त्यावर धावत आहेत. परंतु, चालक आणि वाहकांच्या कमतरतेमुळे ६० बस वापराविना धूळखात पडल्या आहेत. त्यांचा आलटूनपालटून वापर केला जात आहे. पुरेशा बस असूनही चालक नसल्याने परिवहन उपक्रमाला नागरिकांना सेवा देण्यात मर्यादा येत आहेत. त्यामुळे तातडीने ठोक पगारी तत्त्वावर ४५० वाहक आणि चालकांच्या भरतीचा निर्णय घेण्यात आला होता. यानुसार, प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता.
सरकारने वेतनावरील खर्च नियंत्रित करण्यासाठी नवीन पदनिर्मितीस बंदी घातली आहे. त्यामुळे सरकारने केडीएमटीचा ठोक पगारी भरतीचा प्रस्ताव फेटाळला. केडीएमटीत बाह्ययंत्रणेकडून (आउट सोर्सिंग) पद्धतीने भरती करावी. तसेच कोणतीही पदनिर्मिती न करता त्यावरील खर्च ‘कार्यालयीन खर्च’ या उद्दिष्टाखाली केडीएमटीच्या उत्पन्नातून भागवावा, असे निर्देश सरकारने दिले होते. त्यानुसार, उपक्रमाने गुरुवारच्या परिवहन समितीच्या बैठकीत प्रस्ताव दाखल केला होता. तो चर्चेला येताच सरकारचा यासंदर्भातील अध्यादेश समितीला सादर करावा, अशी मागणी करताना प्रशासनालाच कंत्राट नेमण्यात स्वारस्य असल्याचा आरोप सदस्यांनी केला. त्यावर, परिवहन समितीचा ठोक पगारी भरतीचा प्रस्ताव आयुक्तांनी सरकारला पाठवला होता. परंतु, तो नामंजूर झाल्याचे पत्र सरकारने आयुक्तांना पाठवल्याची माहिती के डीएमटीचे महाव्यवस्थापक देविदास टेकाळे यांनी दिली. (प्रतिनिधी)
>कंत्राटदाराला तीन महिने मुदतवाढ
कंत्राटी पद्धतीने चालक व वाहक कर्मचारी देणाऱ्या जी.ए. डिजिटल वेब वर्ल्ड या कंत्राटदाराची मुदत गुरुवारी संपुष्टात आल्याने त्याला मुदतवाढ देण्याचा प्रस्तावही दाखल करण्यात आला होता. दरम्यान, कंत्राटदार पुरेशा प्रमाणात चालक-वाहक पुरवत नसल्याकडे लक्ष वेधण्यात आले.मुदत संपुष्टात येत असताना ऐनवेळी हा प्रस्ताव का आणला, हा समितीला वेठीस धरण्याचा प्रकार असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. परंतु, मुदतवाढ न दिल्यास बससेवा ठप्प होईल, या सदस्यांच्या भावना लक्षात घेता संबंधित कंत्राटाला तीन महिन्यांची मुदतवाढ देत असल्याचे सभापती भाऊसाहेब चौधरी यांनी स्पष्ट केले.