कालिदास स्मारक अंधारात
By Admin | Updated: June 29, 2014 00:46 IST2014-06-29T00:46:49+5:302014-06-29T00:46:49+5:30
‘आषाढस्य प्रथम दिवसे’ हा महाकवी कालिदासांचा स्मृतिदिन रामटेक शहरात तसा कुठल्याही कार्यक्रमाविनाच साजरा झाला. कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाने तर शुक्रवारीच कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

कालिदास स्मारक अंधारात
कालिदास स्मृतिदिन : पालिका प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधींची अनास्था उघड
रामटेक : ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ हा महाकवी कालिदासांचा स्मृतिदिन रामटेक शहरात तसा कुठल्याही कार्यक्रमाविनाच साजरा झाला. कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाने तर शुक्रवारीच कार्यक्रमाचे आयोजन केले होते. गडावरील कालिीदास स्मारकावर साधी विद्युत रोशनाई करण्यात आली नव्हती. पालिका प्रशासनातर्फे कुठलाही कार्यक्रम आयोजित करण्यात आला नव्हता. यानिमित्ताने महाकवी कालिदासांप्रति प्रशासन व लोकप्रतिनिधींची अनास्था उघड झाली.
महाकवी कालिदासांना रामटेकच्या रामगिरीवर आषाढ मेघ पाहून ‘मेघदूत’ हे महाकाव्य स्फुरले. कालिदासांच्या वास्तव्याने रामटेकला अजरामर असा साहित्यिक वारसा लाभला. याचे गोडवे गाऊन राजकीय भांडवल करण्यास राजकीय मंडळी मागे पाहात नाही. प्रत्यक्षात कालिदासांविषयी काही करायची वेळ येते, तेव्हा कुणीही काहीही करायला तयार नसतात याची प्रचिती आली.
कालिदास स्मारक हेदेखील रामटेकचे वैभव आहे. या परिसरात साकारलेली ओमची भव्य वास्तूदेखील देखणी आहे. स्थानिक पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे या वास्तूची दैनावस्था झाली आहे. संगीत कारंजे पाण्याअभावी बंद आहेत. लॉन सुकले आहेत. वास्तूचे सौंदर्य लयाला गेले. कालिदासांच्या स्मृितदिनी प्रशासनाने या स्मारकावर रोशनाई करायला हवी होती, मात्र येथे साधा दिवाही लावण्यात आला नाही.
महाकवींच्या नावाने राज्य शासनाने कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाची निर्मिती केली. या विद्यापीठात कालिदास स्मृतिदिनाचा कार्यक्रम हा शनिवारऐवजी शुक्रवारी आयोजित करण्यात आला होता. यानिमित्त संशोधन सभेचे आयोजन करण्यात आले होते, असे सांगण्यात आले. शनिवारी या विद्यापीठाचा संपूर्ण परिसर निर्मनुष्य होता. शनिवारी सुटी असल्याने एक दिवस आधीच कार्यक्रम घेण्यात आल्याचे संबंधितांनी सांगितले. सुटीच्या दिवशी कार्यक्रमाला कर्मचारी उपस्थित राहण्यास कुरकुर करतात, असेही स्पष्ट केले.
तालुका पत्रकार संघाच्यावतीने कालिदास स्मारक परिसरात काव्यमैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. यात मिनाज पौचातोड, पवन कामङ्मी, प्रा. जगदीश गुजरकर, वसंत डामरे, अनुराग गिरधर आदींनी काविता सादर केल्या. दीपक गिरणर यांनी कालीदासांच्या काव्यप्रतिभा उपस्थितांसमोर मांडली. यावेळी त्रिलोक मेहर, नत्थू घरजजाळे, संजय मुलमुले, प्रवीण टाकळे, अनिल वाघमारे उपस्थित होते. सीएसी आॅल राऊंडरचे अमोल खंते यांनी कपूरबावडी ते गडमंदिरदरम्यान ट्रेकिंगचे आयोजन केले होते. मात्र, या कार्यक्रमालाही पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही. (तालुका प्रतिनिधी)