कष्टकऱ्यांच्या जीवनातील न्यायदेवता

By Admin | Updated: February 21, 2015 01:31 IST2015-02-21T01:31:06+5:302015-02-21T01:31:06+5:30

न्यायहक्क मिळवून देणारे अ‍ॅड. गोविंद पानसरे ! अभ्यासू कामगार नेता, स्पष्ट आणि परखड वक्ता अशीच ओळख अ‍ॅड. पानसरे यांची संपूर्ण महाराष्ट्राला आहे.

Judge of the life of the oppressors | कष्टकऱ्यांच्या जीवनातील न्यायदेवता

कष्टकऱ्यांच्या जीवनातील न्यायदेवता

आज-काल त्यागीवृत्तीने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची वानवा आहे. प्रत्येकजण पैसा आणि सत्तेच्या मागे लागलेला आपणाला पहायला मिळतो. पण कोल्हापुरात असेही एक व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेलं की, ज्याच्याकडे वैचारिक संपन्नतेशिवाय काहीच नाही आणि कष्टकरी-श्रमिकांना स्वाभिमानी जीवनाचा मार्ग दाखविणारे, त्यांना लोकशाहीने देऊ केलेले न्यायहक्क मिळवून देणारे अ‍ॅड. गोविंद पानसरे ! अभ्यासू कामगार नेता, स्पष्ट आणि परखड वक्ता अशीच ओळख अ‍ॅड. पानसरे यांची संपूर्ण महाराष्ट्राला आहे.
------------------
धनिक आणि भांडवलदारांच्या पिळवणुकीने दबलेल्या श्रमिक कामगारांना न्याय मिळवून देण्यातच अ‍ॅड. गोविंद पानसरे यांचे गेल्या अनेक वर्षांपासूनचे अतूट असे नातंच निर्माण झाले आहे. समाजातील दबल्या गेलेल्या महागाईने होरपळून निघालेल्या आणि संसाराचा गाडा कशा पद्धतीने चालवावा, अशा अनेक प्रश्नांच्या गर्तेत सापडलेल्या कष्टकऱ्यांच्या जीवनात अ‍ॅड. पानसरे म्हणजे साक्षात एक न्यायदेवताच. कारण त्यांच्याकडे गेलो की, आपणाला हमखास न्याय मिळेल, अशी अनेकांची भावना असते. पानसरेही या विश्वासाला पात्र ठरलेले आहेत. त्यातूनच त्यांची ओळख ‘गरिबांचा नेता’ म्हणून झाली. त्यांना त्यांचे सर्व सहकारी तसेच श्रमिक आदराने ‘आण्णा’ म्हणून संबोधतात.
आण्णांनी अर्थातच अ‍ॅड. पानसरे यांनी लढे उभारताना कधीच उथळपणा केला नाही किंवा एखादा लढा मध्येच सोडून दिला नाही. ज्या विषयांवर आपणाला लढा उभा करायचा आहे त्या विषयाचा, प्रश्नांचा प्रथम त्यांनी अभ्यास केला. तोच त्यांचा स्थायी स्वभाव आहे. एकदा अभ्यास केला, कायद्यातील तरतूद पाहिल्या की, मग हाती घेतलेल्या विषयाला न्याय मिळेपर्यंत कधी थांबविणे नाही. आण्णांनी एखादे आंदोलन हाती घेतले की, त्याच्याशी संबंधित शासकीय अधिकाऱ्यांना एक प्रकारची धास्ती वाटते, इतका त्यांचा दरारा होता. कारण आण्णा बोलणार ते मुद्देसूद आणि कायदेशीरच ! त्यामुळे समोरच्या माणसाला उत्तर द्यावे लागे ते स्पष्ट आणि स्पष्टच. तिथे फसवेगिरी अजिबात चालणार नाही. त्यामुळेच अ‍ॅड. पानसरे यांच्या कार्याचा केवळ कोल्हापुरातच नव्हे, तर राज्यपातळीवर ठसा उमटला आहे.
राजाराम महाविद्यालयात पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आण्णांनी शहाजी विधी महाविद्यालयातून कायद्याची पदवी घेतली. ऐन उमेदीच्या काळात वृत्तपत्र विक्रेता, म्युनिसिपालिटीत शिपाई, तर स्कूल बोर्डात प्राथमिक शिक्षक म्हणून त्यांनी नोकरी केली. नोकरी किंवा वकिली करून पानसरे यांना त्यांचे आयुष्य आरामात घालविता आले असते, परंतु त्यांचे मन नोकरी करण्यात फार काळ रमले नाही. त्यांनीे गरिबीचे चटके, श्रमिकांची ससेहोलपट पाहिली होती. समाजातील दुर्बल घटकांवर होणारे अन्याय त्यांनी जवळून पाहिले होते. त्यातून त्यांचे व्यक्तिमत्त्व तावून सुलाखून निघाले होते. म्हणूनच त्यांनी दुर्बलांंसाठी आणि कष्टकऱ्यांसाठी संघर्ष करण्याचा निर्णय घेतला. सामान्य कष्टकरी हीच आण्णांची ताकद बनली. या ताकदीच्या जोरावरच त्यांनी अनेक लढे संघर्ष करून जिंकले.
सार्वजनिक जीवनात गेली साठ- पासष्ठ वर्षे अ‍ॅड. पानसरे अव्याहतपणे कार्यरत आहेत. त्यांच्यातील वैचारिक वृत्तीने त्यांना १९५२ मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडे खेचले. हा पक्षच त्यांचे सर्वस्व बनला. दहा वर्षे भाकपचे राज्य सेक्रेटरी म्हणून त्यांनी काम केले आहे. सध्या ते राष्ट्रीय कार्यकारिणीवर सदस्य आहेत. संयुक्त महाराष्ट्र समितीच्या कोल्हापूर जिल्हा शाखेचे सेक्रेटरी म्हणून सलग पाच वर्षे त्यांनी काम केले
होते. १९६५च्या उपासमारविरोधी कृती समितीचे नेतृत्व त्यांनी केले. गोवा मुक्ती आंदोलन, संयुक्त महाराष्ट्राचा लढा, महाराष्ट्र-कर्नाटक सीमा लढा, महागाईविरोधी आंदोलन, शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भातील आंदोलने, शेतमजूर, कष्टकरी, श्रमिक, कामगार यांच्या प्रश्नांबाबतची आंदोलने, शेतमजूर, कष्टकरी, श्रमिक, कामगार यांच्या प्रश्नांबाबतची आंदोलने या सगळ्यांमध्ये पानसरे यांचा सहभाग लक्ष्यवेधी आहे. अ‍ॅड. पानसरे एक ज्येष्ठ विचारवंत, अभ्यासू वक्ते म्हणूनही महाराष्ट्राला परिचित होते. स्पष्ट आणि परखड बोलणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. त्यांनी महाराष्ट्रभर अनेक विषयांवर व्याख्याने दिली आहेत. पानसरे एक उत्तम लेखकही आहेत. त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर सुमारे एक डझन पुस्तके लिहिली आहेत. शिवाजी कोण होता? या पुस्तकाच्या तर कानडी, ऊर्दू, गुजराती, इंग्रजी, हिंदी भाषेत सतरा आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या आहेत. मंडल आयोग आणि राखीव जागांचा प्रश्न, अजून न स्वीकारलेला मंडल आयोग, मंडल आयोग आणि मागासलेले मुस्लिम, काही कामगार कायद्यांची तोंडओळख, ३७० कलमाची मूळकथा, मुस्लिमांचे लाड, पंचायत राज्याचा पंचनामा, राजर्षी शाहू वसा आणि वारसा, शेती धोरण परधार्जिणे, कामगारविरोधी धोरणे या पुस्तकांचा त्यामध्ये समावेश आहे. कामगार कायद्याचा प्रचंड अभ्यास असणाऱ्या पानसरेंना मालकांची बाजू घेऊन अमाप पैसा मिळविता आला असता, परंतु अशा पैशापेक्षा कामगारांच्या हक्काला त्यांनी प्राधान्य दिले. म्हणूनच सुरूवातीला म्हटल्याप्रमाणे समाजात त्यागी वृत्तीने काम करणारी माणसं खूपच कमी आहेत. अ‍ॅड. गोविंद पानसरे मात्र आजही सर्वसामान्य कष्टकरी-श्रमिक व कामगारांच्या न्यायहक्कांसाठी त्यागीवृत्तीने काम करताना सातत्याने दिसत होते.
- भारत चव्हाण, कोल्हापूर

Web Title: Judge of the life of the oppressors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.