फूट पाडणाऱ्यांविरुद्ध जिहाद पुकारा
By Admin | Updated: February 16, 2016 03:03 IST2016-02-16T03:03:23+5:302016-02-16T03:03:23+5:30
भारतात सर्व जाती-धर्मांचे लोक आनंदाने एकत्रित नांदतात. राजकीय स्वार्थासाठी काहीजण गैरसमज पसरवून दोन धर्मांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत

फूट पाडणाऱ्यांविरुद्ध जिहाद पुकारा
मुंबई : भारतात सर्व जाती-धर्मांचे लोक आनंदाने एकत्रित नांदतात. राजकीय स्वार्थासाठी काहीजण गैरसमज पसरवून दोन धर्मांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. सर्वधर्मियांनी एकत्र येऊन अशा राजकारण्यांविरुद्ध जिहाद पुकारण्याची गरज निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. श्रीपाल सबनीस यांनी केले.
आॅल इंडिया कौमी तंजीम संस्थेतर्फे ‘जिहाद अगेन्स्ट टेरिरिझम’ परिषदेत ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी स्वामी अग्निवेश म्हणाले, ‘देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सर्व जातीधर्मांचा समावेश होता. मात्र राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचा काडीमात्रही सहभाग नव्हता. एकाही नेत्याचा सहभाग असल्यास मोहन भागवत यांनी सांगावे,’ असे आव्हान त्यांनी दिले. माजी केंद्रीय राज्यमंत्री व खा. तारीक अन्वर यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानाच्या सभागृहात रविवारी ही परिषद झाली.
‘स्वत:च्या इंद्रियांवर विजय मिळवून अंतकरण शुद्ध करणे, हा इस्लामी जिहादचा खरा अर्थ आहे,’ असे श्रीपाल सबनीस यांनी सांगितले. ते म्हणाले की, ‘जिहादचा संबंध काहीजण जाणीवपूर्वक दहशतवादाशी जोडतात. महंमद पैगंबरांनी एका व्यक्तीचा खून हा पूर्ण मानव जातीची हत्या असल्याची शिकवण दिली आहे. त्यामुळेच एका हातात कुराण व दुसऱ्या हातात शस्त्र घेत स्वत:ला खलिफा म्हणवून घेत निरपराधांची कत्तल करणाऱ्या बगदादीचा समस्त इस्लाम धर्मियांनी निषेध केला आहे.’
तारीक अन्वर म्हणाले की, ‘इस्लामी जिहाद व दहशतवाद ही परस्परविरुद्ध दोन टोके आहेत. त्याचा चुकीचा अर्थ काढला जात आहे. केंद्र सरकार आरएसएसचा अजेंडा पुढे चालवित आहे. अल्पसंख्याका जाणीवपूर्वक खोट्या गुन्ह्यात अडकविले जात आहे. त्याविरुद्ध सर्व धर्मनिरपेक्ष शक्तींनी एकत्र लढा दिला पाहिजे.’
कौमी तंजीमचे प्रदेशाध्यक्ष मुनाफ हकीम यांनी राज्यात जिल्हास्तरावर जिहाद विरुद्ध आतंकवाद ही चळवळ राबविली जाणार असल्याचे सांगितले. त्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचे सहकार्य घेतले जाणार असल्याचेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)