कारागृह परिसरात जॅमर
By Admin | Updated: July 23, 2014 00:55 IST2014-07-23T00:55:10+5:302014-07-23T00:55:10+5:30
येथील मध्यवर्ती कारागृहात सुरू असलेला अनागोंदी कारभार रोखण्यासाठी कारागृह परिसरात जॅमर लावण्यात आल्याची माहिती आहे. लोकमतने ११ जुलैच्या अंकात ठळकपणे कारागृहातील अनागोंदीची

कारागृह परिसरात जॅमर
अनागोंदीची गंभीर दखल : दोषी अधिकाऱ्यांवरही लवकरच कारवाई
नागपूर : येथील मध्यवर्ती कारागृहात सुरू असलेला अनागोंदी कारभार रोखण्यासाठी कारागृह परिसरात जॅमर लावण्यात आल्याची माहिती आहे. लोकमतने ११ जुलैच्या अंकात ठळकपणे कारागृहातील अनागोंदीची वरिष्ठ पातळीवर दखल घेण्यात आल्याचे वृत्त प्रकाशित केले होते. त्या अनुषंगाने प्रभावी उपाययोजना केल्या जाणार असल्याचे वृत्तात नमूद केले होते, हे विशेष!
भक्कम तटबंदी आणि राज्यातील अतिसुरक्षित कारागृहांपैकी एक कारागृह म्हणून नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहाचे नाव आहे. त्यामुळेच येथील मध्यवर्ती कारागृहात बॉम्बस्फोटातील दहशतवादी, नक्षलवादी, मुंबई अंडरवर्ल्ड डॉन (अरुण गवळी), त्यांचे शूटर, पाकिस्तान तसेच अन्य विदेशी कैद्यांना ठेवण्यात आले आहे. असे खतरनाक गुन्हेगार कारागृहात असतानादेखील खतरनाक कैद्यांना कारागृहातील बराकीतच अंडी, चिकन, मटन, तंदूर, बिर्याणी आणि थंडगार बीअरसह महागड्या (ब्रॅण्डेड) दारूच्या बाटल्या, गांजा, गर्द, चरस असे अमली पदार्थ पुरविले जातात. कारागृहात मोबाईलच्या वापरावर बंदी आहे. मात्र, भ्रष्ट अधिकाऱ्यांना यातून हजारो रुपये मिळत असल्यामुळे गुंडांना कारागृहात मोबाईल उपलब्ध करून दिले जातात. हे गुंड (कैदी) मोबाईलवरून शहरातील आपल्या चेल्याचपाट्यांसोबत तसेच व्यापारी, उद्योजकांसोबत संपर्क साधून त्यांना धमक्या देतात. खंडणी मागतात. कोट्यवधींच्या वादग्रस्त जमिनीच्या आतूनच (मोबाईलच्या माध्यमातून) मांडवल्या करतात आणि लाखो रुपये पदरी पाडून घेतात. या पैशातूनच त्यांचे चेलेचपाटे संबंधित गुंडांच्या कोर्ट कारवाईची आणि कारागृहातील ऐषोआरामाची व्यवस्था करतात. याबाबत राज्य सरकार, गृहमंत्री, कारागृह प्रशासनाकडे तक्रारीही केल्या.
लोकमतने या अनागोंदी कारभाराचा वेळोवेळी पाठपुरावा केला. राज्याच्या तुरुंग महानिरीक्षक (एडीजी) मीरा बोरवणकर यांच्याशी संपर्क साधून, कारागृह प्रशासनातील दोषी अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई करणार, अशी विचारणा केली होती. यावेळी त्यांनी येथील कारागृह उपमहानिरीक्षक शशिकांत शिंदे सध्या सुटीवर आहेत. ते परतल्यानंतर अहवाल मागितला जाईल आणि कारवाईचे स्वरूप ठरेल,असे बोरवणकर यांनी म्हटले होते. या पार्श्वभूमीवर, चार दिवसांपूर्वी कारागृहात जॅमर लावण्यात आल्याची माहिती आहे. यामुळे मोबाईलचा वापर थांबेल आणि कारागृहातील गुंडांकडून दिल्या जाणाऱ्या धमक्या, खंडणी वसुली तसेच मांडवल्याही थांबण्याची अपेक्षा आहे. या प्रकारानंतर आता अन्य गैरप्रकार रोखण्याचेही प्रयत्न सुरू झाले असून, दोषी अधिकाऱ्यांवरही लवकरच कारवाई केली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. (प्रतिनिधी)