शेतकऱ्यांची चिंता केली नाही ते तुमचे पाप; जयंत पाटील यांनी विरोधकांना सुनावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 05:29 IST2019-12-18T05:29:26+5:302019-12-18T05:29:30+5:30
विधान परिषदेला वरिष्ठांचे सदस्य मानले जाते. परंतु मंगळवारी सभागृहात अभूतपूर्व गोंधळ झाला व कामकाज सुरू असताना ‘बॅनर’ची खेचाखेची व विरोधकांकडून चक्क बोंबा मारण्यात आल्या.

शेतकऱ्यांची चिंता केली नाही ते तुमचे पाप; जयंत पाटील यांनी विरोधकांना सुनावले
विशेष प्रतिनिधी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आॅक्टोबर ते नोव्हेंबरदरम्यान राज्यात अतिवृष्टी झाली तेव्हाच तुमचेच सरकार होते मग हेक्टरी २५ हजार रुपये मदतीची घोषणा तेव्हाच का केली नाही, असा सवाल वित्तमंत्री जयंत पाटील यांनी मंगळवारी विधानसभेत केला. आता शेतकऱ्यांचा इतकाच पुळका असेल तर १४ हजार ६०० कोटी रुपयांची मदत केंद्राकडून मिळवून देण्यासाठी पुढे या, असे आव्हानही त्यांनी भाजपला दिले.
पाटील म्हणाले की, विरोधक आज करीत असलेली मागणी हास्यास्पद आहे. तेव्हा मदत द्यायला तुमचे हात कुणी धरले होते? पहिल्याच दिवशी असा कांगावा तुम्हाला शोभत नाही. आमच्या सरकारने शेतकºयांना ६६०० कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. त्यातील २१०० कोटी रुपये वितरित केले आहेत. अतिवृष्टीग्रस्तांसाठी ७४०० कोटी तर पूरग्रस्तांसाठी ७२०० कोटींची मदत राज्याने केंद्राकडे मागितली आहे. केंद्राकडून अद्याप मदत आलेली नसताना, राज्याने स्वत:हून मदत दिली. आम्ही शेतकºयांना वाºयावर सोडणार नाही. शेतकºयांविषयीचा भाजपचा पुळका किती नाटकी आहे, हे शेतकºयांना कळल्यानेच त्यांनी तुम्हाला विरोधी पक्षात बसविले आहे, अशी टीका त्यांनी केली. विधानसभा कामकाजात मंगळवारी कांदा भाववाढ आणि टंचाई, क्यार वादळामुळे झालेले नुकसान या विषयांवर लक्षवेधी सूचना होत्या. गदारोळामुळे त्या पुढे ढकलाव्या लागल्या.
‘विरोधकांचा पुळका म्हणजे मगरीचे अश्रू’
विधान परिषदेत एकीकडे विरोधकांच्या बोंबा सुरू असताना वित्तमंत्री जयंत पाटील यांनी सरकारचे निवेदन मांडत त्यांच्या विशेष ‘स्टाईल’मध्ये चिमटे काढले. हा पुळका म्हणजे मगरीचेच अश्रू असल्याचा टोला त्यांनी लगावला. जयंत पाटील बोलत असताना विरोधकांकडून बोंबा मारणे सुरू होते. आज विरोधी बाकांवरील काही सदस्यांना जास्त जोर आला आहे. विशेषत: आमच्याकडून तिकडे गेलेले घोषणा द्यायला जास्त पुढे दिसत आहेत. विरोधकांनी आपले कर्तव्य समजून घ्यावे, असा टोला पाटील यांनी लगावला.
सभागृहाचा किती वेळ वाया घालविणार?
विधान परिषदेला वरिष्ठांचे सदस्य मानले जाते. परंतु मंगळवारी सभागृहात अभूतपूर्व गोंधळ झाला व कामकाज सुरू असताना ‘बॅनर’ची खेचाखेची व विरोधकांकडून चक्क बोंबा मारण्यात आल्या. झालेल्या प्रकाराबाबत सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सदस्यांना त्यांच्या कर्तव्याचीच आठवण करून दिली, तर उपसभापती नीलम गोºहे यांनी सदस्यांच्या वर्तणुकीवर नाराजी व्यक्त केली.
विधान परिषद हे वरिष्ठांचे सभागृह आहे. विरोधक असो किंवा सत्ताधारी, सभागृहाची प्रतिष्ठा सांभाळणे हे प्रत्येक सदस्याचे कर्तव्य आहे. सभागृहात बॅनर फडकवणे, घोषणा देणे, सभात्याग करणे ही परंपरा बनली आहे. अशा प्रकारांमुळे सभागृहात काम होत नाही. सभागृहाचा आणखी किती वेळ वाया घालविणार, असा सवालच सभापतींनी केला. यापुढे फलक आणणे, बॅनर झळकवणे असे प्रकार टाळून सदस्यांनी गोंधळाला आवर घालावा व संयम राखावा. सर्वांनी सभागृहाची प्रतिष्ठा सांभाळावी, अशी सूचनादेखील त्यांनी केली.