शेतीच्या आवर्तनाचा मुद्दा येणार ऐरणीवर
By Admin | Updated: November 12, 2015 03:10 IST2015-11-12T03:10:12+5:302015-11-12T03:10:12+5:30
उत्तर नगर जिल्ह्यातून शेतीसाठी आवर्तन सोडण्याची मागणी पुढे येत असून, दिवाळीनंतर शेतीच्या आवर्तनाचा मुद्दा चांगलाच पेटण्याची चिन्हे आहेत़ मुळा धरणात शेतीसाठी पाणी शिल्लक आहे़

शेतीच्या आवर्तनाचा मुद्दा येणार ऐरणीवर
अहमदनगर : उत्तर नगर जिल्ह्यातून शेतीसाठी आवर्तन सोडण्याची मागणी पुढे येत असून, दिवाळीनंतर शेतीच्या आवर्तनाचा मुद्दा चांगलाच पेटण्याची चिन्हे आहेत़ मुळा धरणात शेतीसाठी पाणी शिल्लक आहे़ पण, भंडारदरा धरणातून शेतीसाठी पाणी शिल्लक राहत नसल्याने उत्तर नगर जिल्ह्यातील सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे़
मुळा व भंडारदरा धरण उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरले आहे़ या दोन्ही धरणांमुळे उत्तर नगर जिल्ह्यातील शेती फुलली,़ मात्र समन्यायी पाणीवाटप कायद्याने पाणी जायकवाडीला सोडण्यात आले़ प्राधिकरणाच्या या निर्णयाविरोधात उत्तरेतील साखर कारखाने व लोकप्रतिनिधींनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली़ न्यायालयाने याचिका फेटाळत मुळा व भंडादरातून आठ टीएमसी पाणी जायकवाडीला सोडण्याचा निर्णय कायम ठेवला़ त्यानुसार मुळा व भंडारदरा धरणातून जायकवाडीत पाणी सोडण्यास प्रारंभ झाला़ मराठवाड्याला पाणी सोडण्यास उत्तर नगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींकडून विरोध झाला नाही़ मात्र जायकवाडीला सोडले तसे नगर जिल्ह्यातील शेतीला पाणी द्या, अशी आग्रही मागणी उत्तर नगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींकडून करण्यात येत आहे़ जायकवाडीला १ हजार ८४४ दशलक्ष घनफुट पाणी सोडल्यानंतर मुळा धरणात ८ हजार ३४२ दशलक्ष घनफुट पाणी असेल़ उपलब्ध पाणीसाठ्यातून बाष्पीभावन, पिण्याचे पाणी, टँकर, एमआयडीसी, महात्मा फुले कृषी विद्यापीठाला पाणी देऊन २ हजार ७९३ दशलक्ष घनफुट पाणीसाठा शेतीसाठी शिल्लक राहणार आहे़ शेतीसाठी एक आवर्तन सोडायचे झाल्यास ५ हजार ५०० दशलक्ष घनफुट पाणी आवश्यक आहे़ तुलनेत पाणीसाठा कमी असेल़ त्यामुळे ५० टक्के पाणी शेतीला देण्याच्या निर्णयापर्यंत प्रशासन आले़ परंतु त्यास वरिष्ठ कार्यालयाकडून परवानगी मिळते की नाही, याबाबत साशंकता आहे़ भंडारदरातून जायकवाडीसाठी ६़५० टीएमसी पाणी सोडण्यात येईल़ या धरणात एकूण ११ हजार ५२९ दशलक्ष घनफुट पाणीसाठा उपलब्ध होता़ त्यातून जायकवाडीला ६ हजार ५०० दशलक्ष घनफुट पाणी सोडण्यात आले़ परिणामी भंडारदरा धरणात ४ हजार ८३० दशलक्ष घनफूट पाणीसाठा असेल़ या पाणीसाठ्यातून बाष्पीभवन, टँकर, औद्योगिक वसाहतींसाठी एकूण ४ हजार ६३६ दशलक्ष घनफुट पाणी आरक्षित आहे़ आरक्षण वगळल्यास धरणात शेतीसाठी पाणी शिल्लक राहत नसल्याने उन्हाळ्यात भीषण स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे़ (प्रतिनिधी)