आयआरबीकडून नुकसानभरपाई घेणार
By Admin | Updated: July 21, 2015 01:22 IST2015-07-21T01:22:37+5:302015-07-21T01:22:37+5:30
मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर दरड कोसळून झालेल्या भीषण अपघातात मरण पावलेल्यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारने दिलेली नुकसानभरपाई या महामार्गाचे कंत्राटदार आयआरबी

आयआरबीकडून नुकसानभरपाई घेणार
मुंबई : मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर दरड कोसळून झालेल्या भीषण अपघातात मरण पावलेल्यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारने दिलेली नुकसानभरपाई या महामार्गाचे कंत्राटदार आयआरबी यांनी दिली पाहिजे, असे निर्देश विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी सोमवारी दिले.संजय दत्त व अन्य सदस्यांनी एक्स्प्रेस-वेवरील अपघाताबाबत स्थगन प्रस्ताव दाखल केला आहे. दरड कोसळण्याच्या घटना वरचेवर घडू लागल्याने वरदान ठरलेला हा महामार्ग दुर्घटनेचा सापळा झाला असून, कंत्राटदार कंपनीवर दरड कोसळून झालेल्या मृत्यूकरिता हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी दत्त यांनी केली. त्याचबरोबर अपघातानंतर उपचाराकरिता लोणावळा येथे सुपरस्पेशालिटी इस्पितळ उभारण्याची मागणी त्यांनी केली.
सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारच्या दुर्घटनेबाबत निवेदन केले. ते म्हणाले की, एक्स्प्रेस-वेवरील दुर्घटनेत दोन जण मरण पावले तर सहा जण जखमी झाले. मृतांच्या नातलगांना प्रत्येकी ४ लाख रुपये भरपाई देण्याचा निर्णय राज्य सरकारने केला आहे. भविष्यात दुर्घटना टाळण्याकरिता दोन कंपन्यांनी सादरीकरण केले असून, पुण्यातील जिआॅलॉजिस्ट यांच्याबरोबर चर्चा केली आहे. शेकापचे जयंत पाटील म्हणाले की, दुर्घटनेस कंत्राटदारांचा बेजबाबदारपणा कारणीभूत असल्याने मृतांच्या नातलगांना राज्य सरकारने नव्हेतर, आयआरबी कंपनीने पैसे दिले पाहिजेत.
सभापती रामराजे निंबाळकर म्हणाले की, मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेच्या देखभालीची जबाबदारी कंत्राटदाराची असल्याने आयआरबीने नुकसानभरपाईची रक्कम देण्याची व्यवस्था करावी. (विशेष प्रतिनिधी)