लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : कृषी विभागातील विविध योजनांमध्ये झालेल्या कथित भ्रष्टाचारप्रकरणी भाजप आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र पाठवून एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. अनेक अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करत त्यांनी कारवाईची आवश्यकता असल्याचे पत्रात नमूद केले.
कृषी विभागातील विविध योजना आणि अधिकाऱ्यांच्या गैरव्यवहाराबाबत केलेल्या तक्रारींवर कारवाई होत नसल्याबाबत धस यांनी हे पत्र लिहिले आहे. जोपर्यंत भ्रष्टाचारात गुंतलेले अधिकारी त्या पदावर आहेत, तोपर्यंत या प्रकरणी लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांवर कारवाई होईल, असे मला वाटत नाही तसेच कृषी अधिकाऱ्यांची भूमिका तत्कालीन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना संरक्षण देणारी असल्याचा दावा धस यांनी पत्रात केला आहे.