Uddhav Thackeray : "लक्ष्मण रेषा ओलांडली की काय होतं, हे कोरोनानं दाखवून दिलं"

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2021 07:53 PM2021-05-22T19:53:32+5:302021-05-22T20:04:43+5:30

International Biodiversity Day 2021 : तांत्रिक आणि शास्त्रीय सल्ला देणारी, जिचा सल्ला बंधनकारक असला पाहिजे अशी संस्था महाराष्ट्रात स्थापन करावी, यासाठी महाराष्ट्राने देशात सर्वात आधी पुढाकार घ्यावा अशी सूचना उद्धव ठाकरे यांनी केली. 

International Biodiversity Day 2021 : CM Uddhav Thackeray appeal people to save biodiversity | Uddhav Thackeray : "लक्ष्मण रेषा ओलांडली की काय होतं, हे कोरोनानं दाखवून दिलं"

Uddhav Thackeray : "लक्ष्मण रेषा ओलांडली की काय होतं, हे कोरोनानं दाखवून दिलं"

googlenewsNext
ठळक मुद्दे'शहरात जैवविविधता असलेले मुंबई हे कदाचित एकमेव महानगर'

मुंबई : निसर्ग अजूनही आपल्याकडे मातृत्वाच्या भावनेने पहातो आणि आपल्याला जपतो आहे. पण लक्ष्मण रेषा ओलांडली की काय होते हे कोरोना विषाणुने दाखवून दिले आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) म्हणाले. आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनाच्या (International Biodiversity Day 2021) निमित्ताने वन विभागाने आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये ते बोलत होते. (International Biodiversity Day 2021 : CM Uddhav Thackeray appeal people to save biodiversity)

यावेळी विकास कामे करताना ती निसर्गाची जपणूक (Conservation of Nature) करून कशी केली जावीत, हे सांगणारी आणि यासाठीचा तांत्रिक आणि शास्त्रीय सल्ला देणारी, जिचा सल्ला बंधनकारक असला पाहिजे अशी संस्था महाराष्ट्रात स्थापन करावी, यासाठी महाराष्ट्राने देशात सर्वात आधी पुढाकार घ्यावा अशी सूचना उद्धव ठाकरे यांनी केली. 

संजीवनी जपली पाहिजे
रामायणात लक्ष्मणाला वाचवण्यासाठी संजीवनी वनस्पती आणावी लागली. माझ्या मते संजीवनी म्हणजे काय तर आपल्यासोबत जगणारी आणि आपल्याला जगवणारी जी गोष्ट आहे ती संजीवनी, आपण ती जपली पाहिजे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. आपण विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा ऱ्हास करत चाललो आहेत असं सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, त्यामुळेच जंगलाचा ऱ्हास करून विकास कामांचे प्रस्ताव जेव्हा आपल्यासमोर येतात तेव्हा त्याला आपला विरोध असतो. याचा अर्थ आपला विकासाला विरोध आहे असे नाही तर निसर्गस्नेही विकासाची संकल्पना आपल्याला मान्य आहे असे ते म्हणाले.

("...तेव्हा १४ वर्षांच्या मुलीला pregnant केलं होतं"; अमेरिकी खासदाराच्या गौप्यस्फोटाने खळबळ)

मानवी वस्तीवर वन्यजीवांनी कधी अतिक्रमण केल्याचे पाहिले आहे का, त्यांनी एखादी बिल्डिंग रिकामी करून , पाडून तिथे राहण्यास सुरुवात केली असं ऐकलं आहे का, नाही, पण माणूस मात्र वन्यजीवांच्या नैसर्गिक अधिवासावर अतिक्रमण करत असल्याचे दिसते असे सांगून ते म्हणाले की, गेल्यावर्षी निसर्ग चक्रीवादळ आले, यावर्षी तोक्ते चक्रीवादळ आले. चक्रीवादळ आले की आपण हवामान बदलाचे कारण सांगतो. पण हवामान बदल होण्यास कोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत याचा आपण गांभीर्याने विचार करणार आहोत का, असेही ते म्हणाले.

जैवविविधतेविषयी जनजागृती व लोकसहभागाची गरज
जैवविविधतेत नष्ट होणाऱ्या प्राण्यांची आणि वनस्पतींची नोंद घेणे एवढेच काम या क्षेत्रात होऊ नये तर मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी. लोकसहभाग वाढवून त्याच्या रक्षणाचे काम व्हावे असे मुख्यमंत्री म्हणाले.

नवोदित संशोधकांना प्रोत्साहन देण्याची गरज
आजच्या युवा पिढीमध्ये निसर्ग, जैवविविधता याविषयी प्रचंड रस आहे ते या क्षेत्रात अभ्यास करून, संशोधन करून पुढे जाऊ इच्छितात. अशा सर्व युवकांना सहकार्य आणि पाठिंबा देण्याची गरज आहे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

शहरात जैवविविधता असलेले मुंबई हे कदाचित एकमेव महानगर
आरेचे जंगल आपण वाचवले. शहरात जंगल आणि या जंगलामध्ये प्रचंड जैवविविधता असलेले आरेचे क्षेत्र आपण जपले. जगात अशा प्रकारे शहरात जैवविविधता असलेले मुंबई हे कदाचित एकमेव महानगर असेल असेही ते म्हणाले.

लक्ष्मणरेषा ओलांडू नये
निसर्ग अजूनही आपल्याकडे मातृत्वाच्या भावनेने पाहतो आणि आपल्याला जपतो आहे. पण लक्ष्मण रेषा ओलांडली की काय होते हे कोरोना विषाणूने दाखवून दिले आहे असे मुख्यमंत्री म्हणाले.

सुयोग्य वर्तन हवे
निसर्गासोबत जगण्यासाठी सुयोग्य वर्तन ( ॲप्रोपियेट बिहेविअर) विकसित करायला हवे. असे झाले तरच 'आरोग्यदायी विकास' होईल असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. जैवविविधता मंडळाचे अध्यक्ष डॉ.शेषराव पाटील यांनी जैवविविधता मंडळाच्या कामाची माहिती दिली. पर्यावरण रक्षण आणि संवर्धनातून विकासाची संकल्पना पुढे नेल्यास हा विकास शाश्वत ठरेल आणि मानवास कल्याणकारी ठरेल असेही ते यावेळी म्हणाले.

Web Title: International Biodiversity Day 2021 : CM Uddhav Thackeray appeal people to save biodiversity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.