उपायुक्तांमार्फत होणार चौकशी

By Admin | Updated: September 10, 2016 02:03 IST2016-09-10T02:03:03+5:302016-09-10T02:03:03+5:30

कल्याणमधील पोलीस उपनिरीक्षक नितीन डगळे यांना बुडवून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणाची पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यामार्फत चौकशी करण्याचे आदेश

The inquiry will be conducted by the Deputy Commissioner | उपायुक्तांमार्फत होणार चौकशी

उपायुक्तांमार्फत होणार चौकशी

जितेंद्र कालेकर,

ठाणे- कल्याणमधील पोलीस उपनिरीक्षक नितीन डगळे यांना बुडवून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणाची पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यामार्फत चौकशी करण्याचे आदेश ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी दिले असल्याचे ‘लोकमत’ला सांगितले. तसेच याबाबतचा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवला जाणार असून यातील आरोपींची कोणत्याही प्रकारे गय केली जाणार नाही, असे सिंग यांनी स्पष्ट केले.
गेल्या काही दिवसांमध्ये ठाणे आणि कल्याण या भागांत पोलिसांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे. बुधवारी पोलीस अधिकाऱ्याला बुडवून ठार मारण्याचा प्रयत्न केला गेला. त्या पार्श्वभूमीवर सिंग यांच्याशी बातचीत केली, त्यावेळी त्यांनी वरील शब्दांत आपली भूमिका स्पष्ट केली. वाढत्या हल्ल्यांसंदर्भात पोलीस आता आपली काय भूमिका घेणार आहेत, असे विचारले असता ते म्हणाले की, पोलिसांवरील हल्ले कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाहीत. हल्ले करणारी व्यक्ती कोणीही असो, तिच्यावर कारवाई केली जाईल.
यापुढे असे हल्ले झाले तर भारतीय दंड विधानाच्या कलम ३५३ अन्वये दाखल होणाऱ्या गुन्ह्यांच्या शिक्षेत वाढ करण्याचा प्रस्ताव पोलीस महासंचालकांनी राज्य शासनाला सादर केला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर हल्लेखोरांना जास्तीतजास्त शिक्षा होणार आहे, परिणामी त्यांच्यावर जरब बसेल, असा दावाही त्यांनी केला.
कल्याण प्रकरणात राजकीय दबाव येत असल्याचाही त्यांनी इन्कार केला. असा दबाव आला असता तर कलम ३०७ (खुनाचा प्रयत्न करणे) या कलमाखाली गुन्हा दाखल झाला नसता आणि आरोपींना थेट १५ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली नसती. आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. उलटपक्षी या प्रकरणाची आपण गंभीर दखल घेतली असून थेट पोलीस उपायुक्तांमार्फतच या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिल्याचेही ते म्हणाले.
>जनमानसातील पोलिसांची प्रतिमा सुधारण्याचे प्रयत्न
जनमानसातील पोलिसांची प्रतिमा उंचावण्यासाठी पोलिसांमध्ये नेहमीच वेगवेगळे उपक्रम, रिफ्रेशमेंट कोर्स, पोलीस रायझिंग डे निमित्त विविध शाळा, महाविद्यालयांमध्ये कार्यक्रम घेतले जातात.
याशिवाय, पोलिसांच्या कार्यप्रणालीची ओळख करून दिली जाते. तसेच गुन्हे प्रकटीकरणाचे प्रमाण वाढवणे, फिर्यादीला सौजन्याची वागणूक द्यावी, यासाठीही प्रत्येक गुन्हे आढावा बैठकीत सूचना करण्यात येत असतात. ही प्रक्रिया हल्ले झाल्यानंतर नाही तर यापूर्वीपासूनच सुरू असल्याचेही ते म्हणाले. ज्या अधिकाऱ्यावर हल्ला झाला, त्याने जरीमरी मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांचा ढोल फाडला तसेच त्यांनी बुटासहित मूर्तीचे विसर्जन केल्याच्या आरोपाचाही पोलीस आयुक्तांनी इन्कार केला. हा आरोप खोटा आहे. गरज पडल्यास कोणीही यासंदर्भात व्हायरल झालेली क्लिपिंग पाहावी, असेही ते म्हणाले.
>नागरिकांमधील नैराश्याचा अभ्यास करणार
हल्ल्यांमागे नागरिकांमधील पोलिसांवरचा रोष, लाचखोरी किंवा फिर्यादीला पोलीस ठाण्यात सौजन्याची वागणूक न मिळणे अशीही काही कारणे असल्याकडे सिंग यांचे लक्ष वेधले असता त्यांनी त्याचा साफ इन्कार केला.
ठाण्यात नितीन कंपनीजवळ एका महिला कॉन्स्टेबलवर हल्ला करणाऱ्याने वाहतुकीचे नियम तोडले होते. त्यामुळे तिने कारवाईसाठी त्याला थांबण्याचा इशारा केल्यानंतर त्याने तिला मारहाण करीत तिचा विनयभंग केला.
यात लाचखोरी किंवा फिर्यादीला सौजन्यपूर्ण वागणूक न देण्याचा कुठेही प्रश्नच येत नाही. जेथे पोलिसांवर हल्ले झाले, तिथे ते वैयक्तिक कारणातून झाले आहेत. नागरिकांमधील वाढते नैराश्य किंवा इतर कोणती कारणे यामागे आहेत, याचा मात्र बारकाईने अभ्यास करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
असा रोष असता तर पोलिसांच्या समर्थनार्थ नागरिकांनी मोर्चे काढले नसते. मुंब्रा, कल्याण आणि ठाण्यातही नागरिकांनी उत्स्फूर्तपणे मोर्चे काढले, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

Web Title: The inquiry will be conducted by the Deputy Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.