राज्यात पावसाचा जोर वाढला

By Admin | Updated: July 1, 2016 04:08 IST2016-07-01T04:08:46+5:302016-07-01T04:08:46+5:30

कोकणासह विदर्भ तसेच मराठवाड्यातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याने पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

Increased rainfall in the state | राज्यात पावसाचा जोर वाढला

राज्यात पावसाचा जोर वाढला


पुणे : राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. कोकणासह विदर्भ तसेच मराठवाड्यातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याने पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर वगळता पश्चिम महाराष्ट्रात मात्र अजूनही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. येत्या ४८ तासांत कोकण वगळता इतर ठिकाणी पावसाचा जोर कमी होईल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.
बंगालच्या उपसागरात हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने महाराष्ट्रात बाष्पयुक्त वारे मोठ्या प्रमाणात वाहत आहेत. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे. विदर्भ आणि कोकणात पावसाचा जोर जास्त आहे. गेल्या २४ तासांत विदर्भात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. बल्लारपूर येथे सर्वाधिक २३० मिमी पाऊस
झाला. मराठवाड्यात हिंगोली
आणि नांदेड जिल्ह्यात पावसाचा जोर होता. दमदार पावसाने नद्या-ओढे, नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. त्यापाठोपाठ विदर्भात राजुरा येथे २२०, तर कोकणात कणकवलीमध्ये १४०, हर्णे, पोंभुर्णा येथे ११०, मुरूड येथे १०० मिमी पाऊस झाला.
कोल्हापूर जिल्ह्यातही सर्वदूर पाऊस झाला. शहरात पावसाचा जोर चांगला होता. गेल्या चोवीस तासांत गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक ५६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मुंबईतही दिवसभरात दमदार पाऊस झाला.
विशेषत: ठाणे, नवी मुंबई परिसरात जोरदार सरी बरसल्या. (प्रतिनिधी)
>गेल्या २४ तासांतील राज्यातील पाऊस (मिमीमध्ये) :
बल्लारपूर २३०, राजुरा २२०, कणकवली १४०, सेलू १२०, हर्णे, पोंभुर्णा ११०, मुरूड १००, दापोली, गुहाघर, खेड, कुडाळ, मालवण, सावंतवाडी, वैभववाडी, वसमत ९०, देवगड, रत्नागिरी, वेंगुर्ला, भद्रावती, चामोर्शी, पांढरकेवडा, वरोरा ८०, पालघर, राजापूर, किनवट, देवळी, कोपर्ना ७०, संगमेश्वर, श्रीवर्धन, गगनबावडा, हिंगोली, जिंतूर, चंद्रपूर ६०, चिपळूण, रोहा, आजरा, महाबळेश्वर, नांदगाव, राधानगरी, अंबड, हादगाव, हिमायतनगर, अंजनगाव, बार्शी, भामरागड, चांदूर, शिंहेवाडी, वणी ५०, भिरा, चंदगड, महूर, नांदेड, दर्यापूर, उमरखेड, यवतमाळ ४०.
>वीज पडून मृत्यू
तलावात दुचाकी धुण्यासाठी मित्रासोबत गेलेल्या विद्यार्थ्याचा गुरुवारी वीज पडून मृत्यू झाला. ही घटना गडचिरोली जिल्ह्यातील हेडरी (ता. एटापल्ली) येथे दुपारी ३च्या सुमारास घडली. मीरवा दुलसा लेकामी (रा. हेडरी) असे त्याचे नाव आहे. तो पंदेवाही येथील विनोबा आश्रमशाळेत इयत्ता आठवीत शिकत होता.
>नांदेडमध्ये पुरात अडकलेल्या चौघांची सुटका
नांदेड औंढा व वसमत तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने आसना नदीला पूर आला आहे. सांगवी बंधारा येथील पंप हाउसला पाण्याने वेढा दिल्याने पुरात महापालिकेचे चार पंप आॅपरेटर अडकून पडले होते.
आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकाने सात तासांनंतर त्यांची सुखरूप सुटका केली. विष्णुपुरी जलाशयाची पाणीपातळी खालावल्याने अर्ध्या नांदेड शहराला सांगवी येथील पर्यायी पाणीपुरवठा योजनेद्वारे पाणी सोडण्यात येत आहे़

Web Title: Increased rainfall in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.