तलावांतील साठ्यात वाढ
By Admin | Updated: July 21, 2014 03:28 IST2014-07-21T03:28:20+5:302014-07-21T03:28:20+5:30
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असल्याने सातही तलावांच्या पाणीसाठ्यात वाढ नोंदविण्यात येत

तलावांतील साठ्यात वाढ
मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असल्याने सातही तलावांच्या पाणीसाठ्यात वाढ नोंदविण्यात येत असून, सद्य:स्थितीमध्ये आता या सात तलावांत २ लाख १४ हजार ३० दशलक्ष लीटर उपयुक्त पाणीसाठा असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली.
जून महिन्यात पावसाने दडी मारली होती. त्यामुळे भविष्याचा विचार करीत महापालिकेने २० टक्के पाणीकपात लागू केली होती. जुलैच्या पूर्वाधात पावसाने तलाव क्षेत्रात खाते उघडले. मात्र खबरदारी म्हणून प्रशासनाने पाणेकपात कायम ठेवली. दरम्यान, तलाव क्षेत्रात संततधार सुरू असल्याने पुढील सुमारे २३ दिवस पुरेल एवढा पाणीसाठा वाढला आहे. आणि पाणीसाठ्याची तूट भरून निघण्यासाठी पुढील तीन महिने दमदार पावसाची आवश्यकता आहे, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.
सद्य:स्थितीमध्ये मोडक सागरमध्ये ७३ हजार ५५८ दशलक्ष लीटर उपयुक्त पाणीसाठ्याची नोंद झाली आहे. तानसामध्ये २३ हजार ३८५ दशलक्ष लीटर, विहारमध्ये ८ हजार ४५८ दशलक्ष लीटर, तुलसीमध्ये ६ हजार ४५८ दशलक्ष लीटर, भातसामध्ये ८२ हजार ८३७ दशलक्ष लीटर आणि मध्य वैतरणामध्ये १९ हजार ३३४ दशलक्ष लीटर पाण्यासाठ्याची नोंद झाल्याची माहिती पालिकेने दिली. (प्रतिनिधी)