बेमुदत उपोषण अखेर मागे
By Admin | Updated: January 30, 2015 03:56 IST2015-01-30T03:56:14+5:302015-01-30T03:56:14+5:30
उरण परिसरातील आदिवासी वाड्यातील आदिवासींना न्याय हक्क मिळावा या मागणीसाठी राजिप सदस्य वैजनाथ ठाकूर यांनी

बेमुदत उपोषण अखेर मागे
उरण : उरण परिसरातील आदिवासी वाड्यातील आदिवासींना न्याय हक्क मिळावा या मागणीसाठी राजिप सदस्य वैजनाथ ठाकूर यांनी आदिवासींच्या साथीने प्रजासत्ताक दिनीच तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसण्याच्या दिलेल्या इशाऱ्यानंतर जाग आलेल्या शासनाने ५ फेब्रुवारी रोजी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीने बैठक बोलावून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, तहसीलदारांनी दिलेल्या आश्वासनानंतर आमरण उपोषण तूर्तास मागे घेण्यात आल्याची माहिती वैजनाथ ठाकूर यांनी दिली.
स्वातंत्र्य मिळून ६८ वर्षांचा कालावधी उलटून गेल्यानंतरही उरण परिसरातील अनेक आदिवासी वाड्या वीज, पाणी, आरोग्य, रस्ते आदी मूलभूत सुविधांपासून वंचितच राहिल्या आहेत. जनावरांपेक्षाही हीन जिणे जगणाऱ्या आदिवासींच्या मूलभूत सोयी-सुविधा पुरविण्याच्या मागणीला शासनाने सातत्याने वाटण्याच्याच अक्षता लावल्या. आदिवासींना न्याय्य हक्क मिळावा या मागणीसाठी राजिप सदस्य वैजनाथ ठाकूर यांनी आदिवासींच्या साथीने प्रजासत्ताक दिनीच तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा शासनाला दिला आहे. राजिप सदस्यांनी दिलेल्या अल्टीमेटममुळे शासकीय अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली होती.
अखेर राजिप सदस्यांनीच दिलेल्या अल्टीमेटममुळे जाग आलेल्या प्रशासनाने संबंधित शासकीय अधिकाऱ्यांची बैठक बोलाविण्याचे आश्वासन तहसीलदार नितीन चव्हाण यांनी दिले आहे. लेखी पत्रातून संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठकीतून आदिवासींच्या विकासासाठी योग्य तोडगा काढण्याच्या आश्वासनानंतर राजिप सदस्य वैजनाथ भोईर यांनी केलेले उपोषण तूर्तास मागे घेतले असल्याची माहिती दिली. (वार्ताहर)