महाड तालुक्यात भातलावणीला सुरुवात
By Admin | Updated: June 28, 2016 02:33 IST2016-06-28T02:33:57+5:302016-06-28T02:33:57+5:30
महाड तालुक्यात पावसाने अद्याप जोर धरला नसला तरी दिवसभरात पडणाऱ्या झुंजूमुंजू पावसात शेतकऱ्यांनी भातलावणीस सुरुवात केली

महाड तालुक्यात भातलावणीला सुरुवात
दासगांव : महाड तालुक्यात पावसाने अद्याप जोर धरला नसला तरी दिवसभरात पडणाऱ्या झुंजूमुंजू पावसात शेतकऱ्यांनी भातलावणीस सुरुवात केली आहे. तालुक्यातील सखल भागात साचणाऱ्या पावसाच्या पाण्याचा फायदा घेत शेतकरी भातलावणी करण्याकडे वळला आहे.
कोकणात पावसाने काही दिवसांपूर्वी जोमाने हजेरी लावली असली तरी जोर धरला नाही. गेली दोन दिवस तालुक्यात तुरळक पाऊस पडत असून दिवसभर होणाऱ्या रिपरिप पावसाने तालुक्याच्या सखल भागात पाणी साचू लागले आहे. तालुक्यातील शहराच्या जवळचा परिसर, तसेच सखल भागात शेतात साचलेले पाणी शेतकऱ्यांनी अडवून त्यामध्ये भातलावणी करण्यास सुरुवात केली आहे. पावसात जोर नसल्याने उंच आणि डोंगराळ भागातील शेतकरी अद्याप चिंताग्रस्त आहेत. महाड तालुक्यातील शहराजवळचा परिसर, खाडीपट्टा, नाते विभाग, बिरवाडी विभाग, वाळण विभागात येथे भातलावणीला सुरु वात दिसून येत आहे. ज्या शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने लवकर पेरणी केली होती त्या शेतकऱ्यांची भाताची रोपे पहिल्या पावसातच वर आली होती. त्या रोपांची लावणी आता होणे गरजेचे आहे. याकरिता शेतकऱ्यांनी मिळेल त्या पाण्यावर भातलावणी सुरू केली आहे.
महाड तालुक्यात भातशेतीचे एकूण क्षेत्र १३ हजार ६०० हेक्टर असले तरी या सर्वच क्षेत्रावर सध्या भातपीक घेतले जात नाही. मात्र महाड तालुक्यात गेली अनेक वर्षे पारंपरिक पद्धतीने भात शेती करणारे २८ हजार शेतकरी आहेत. मे महिन्यापासून भाताच्या कामांना सुरुवात होते. त्याची समाप्ती भात लावणी आणि त्यानंतर भात झोडणीपर्यंतच्या या प्रवासात शेतकऱ्यांना अथक परिश्रम घ्यावे लागत आहेत. कोकणातील शेतकऱ्यांचे हे श्रम संपूर्णत: पावसावर अवलंबून आहे. पावसाच्या लहरीपणाचा फटका कोकणातील शेतकऱ्यांना बसत आहे. यावर्षी सुरुवातीपासूनच पावसाने जोर धरला नाही. ढगाळ वातावरणामुळे पाऊस जोमाने हजेरी लावेल, अशी आशा निर्माण झाली होती. मात्र आजही महाड तालुक्यात पडणाऱ्या पावसाने अद्याप पाचशे मि.मी.चा आकडा पार केलेला नाही. तालुक्यात प्रतिवर्षी हे प्रमाण अधिक असतो. मात्र यावर्षी रुसलेल्या पावसाने शेतकऱ्याला चिंता निर्माण केली आहे.
पाऊस पडू लागताच भात लावणीला वेग येतो मात्र यावेळी निर्माण होणारी मजुरांची कमतरता यामुळे आता शेतकरी मिळेल त्या पाण्यावर भात लावणी करून घेत आहेत. (वार्ताहर)
>मुरुड तालुक्यात भात पेरणीची कामे पूर्ण
गेल्या आठ ते दहा दिवसांपासून मुरुड तालुक्यात सुरू असलेल्या पावसामुळे राबांची स्थिती उत्तम असून तालुक्यातील अनेक भागात भातशेतीच्या लावणीस प्रारंभ झाला आहे. मुरुड तालुक्यात एकू ण तीन हजार ९०० हेक्टर भात शेतीचे क्षेत्र असून या सर्व क्षेत्रातील पेरणीचे काम पूर्ण झाले आहे.
यावर्षी तालुक्यात २२५ क्विंटल ६३ कि.ग्रॅ. भात बियाणे शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. गेल्यावर्षी १९२ क्ंिवटलपेक्षा यावर्षीचे प्रमाण जास्त आहे. हल्ली शेतकरी सरकारी बियाणेच वापरत आहेत, अशी माहिती मुरुडचे गटविकास अधिकारी ए. यू. चव्हाण यांनी दिली.
खोडकिडा रोग निर्मूलनासाठी औषध पन्नास टक्के अनुदान उपलब्ध करून देण्यात आले आहे. परंतु त्याचा वापर शेतकऱ्यांनी योग्य प्रकारे करणे गरजेचे आहे. अन्य फवारणीसाठी लागणारी औषधेही उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे सांगून पन्नास टक्के अनुदानासाठी वीस ते पंचवीस रुपये खर्च येतो. परंतु शेतकरी त्याकडे दुर्लक्ष करतात, तसे त्यांनी करू नये असेही ते म्हणाले. मुरुड तालुक्यातील उसरोली, आदाड, वावे, वांद्रे, फोफळी वेळास्ते, सुपेगाव, सर्वे आदि गावातील शेतातील लावणीची कामे जोरात सुरू झाली असून अन्य शेतीतील उखळणीची कामे जोरात सुरू आहे,