कायदेक्षेत्रातील महत्त्वपूर्ण व्यक्ती हरवली; माजी सरन्यायाधीश एस. कपाडिया कालवश

By Admin | Updated: January 6, 2016 01:51 IST2016-01-06T01:51:28+5:302016-01-06T01:51:28+5:30

भारताचे माजी सरन्यायाधीश सरोश होमी कपाडिया यांचे सोमवारी रात्री उशिरा वयाच्या ६८व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांना कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते

The important person in the legislature lost; Former Chief Justice Kapadia Kalvash | कायदेक्षेत्रातील महत्त्वपूर्ण व्यक्ती हरवली; माजी सरन्यायाधीश एस. कपाडिया कालवश

कायदेक्षेत्रातील महत्त्वपूर्ण व्यक्ती हरवली; माजी सरन्यायाधीश एस. कपाडिया कालवश

मुुंबई : भारताचे माजी सरन्यायाधीश सरोश होमी कपाडिया यांचे सोमवारी रात्री उशिरा वयाच्या ६८व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांना मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील केम्प्स कॉर्नर येथील ‘टॉवर आॅफ सायलेन्स’मध्ये सोमवारी संध्याकाळी त्यांच्यावर पारसी धर्मानुसार अंतिम संस्कार करण्यात आले. न्या. कपाडिया शिस्तीमुळे त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये आणि वकिलांमध्ये प्रिय होते. त्यांच्यानंतर त्यांच्या पत्नी शेरनाझ, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.
न्या. कपाडिया यांच्या अंतिम संस्कारांच्या वेळी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश बी.एन. श्रीकृष्ण, न्या. हेमंत गोखले, न्या. सुजाता मनोहर तर मुंबई उच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायाधीश आणि निवृत्त न्यायाधीश डी.के. देशमुख, सी.एस. धर्माधिकारी, ए.आर. जोशी तसेच ज्येष्ठ वकील इक्बाल छागला, अ‍ॅस्पी चिनॉय, एस. सिरवई, अमित देसाई आदी उपस्थित होते. सरन्यायाधीशपद भूषवत असताना कपाडिया गुजरात नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीच्या जनरल कौन्सिलचे अध्यक्ष होते. तसेच नॅशनल लॉ स्कूल आॅफ इंडिया युनिव्हर्सिटीमध्येही ते शिकवत होते. इकोनॉमिक्स, पब्लिक फायनान्स, थेरॉटिकल फिजीक्स, हिंदू आणि बौद्ध तत्त्वज्ञान हे त्यांचे आवडीचे विषय होते.
.............
मुंबई : माजी सरन्यायाधीश सरोश कपाडीया यांच्या निधनाने एक अभ्यासू व्यक्ती हरवली अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. सप्टेंबर १९४७ मध्ये जन्मलेल्या कपाडिया यांनी गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमधून वकिलीचे शिक्षण घेतले. करिअरची सुरूवात त्यांनी चतुर्थ श्रेणीचे कर्मचारी म्हणून केली. त्यानंतर त्यांनी गॅग्रॅट अ‍ॅण्ड को. या लॉ फर्ममध्ये लिपीक म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी कामगारांच्या केसेस लढण्यात प्रसिद्ध असलेले अ‍ॅड. फिरोज दमानिया यांच्या फर्ममध्ये काम केले. १० सप्टेंबर १९७४ रोजी ते मुंबई उच्च न्यायालयाचे वकील म्हणून प्रॅक्टीस करू लागले. ८ आॅक्टोबर १९९१ रोजी त्यांना मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यानंतर २३ मार्च १९९३ रोजी त्यांची मुंबई उच्च न्यायालयाचे कायमस्वरुपी न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. ५ आॅगस्ट २००३ रोजी ते उत्तरांचल उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश झाले. ते १८ डिसेंबर २००३ रोजी ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले. १२ मे २०१० रोजी त्यांनी भारताचे ३८ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली आणि २९ सप्टेंबर २०१२ रोजी ते निवृत्त झाले. १९५० नंतर सर्व सरन्यायाधीश केवळ १८ महिन्यांसाठी या पदावर काम करू शकले. मात्र याला अपवाद न्या. कपाडिया ठरले. त्यांनी २८ महिने हे पद सांभाळले. यावरुनही देशात उलटसुलट चर्चा घडल्या.
‘मी अत्यंत गरीब कुटुंबात जन्माला आलो आहे. एकात्मता हीच माझी संपत्ती,’ असे न्या. कपाडिया एकदा एका कार्यक्रमात म्हणाले होते. तसेच भारतीय असल्याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. कारण याच देशात एक पारसी देशाचा सरन्यायाधीश होऊ शकतो. याच देशात अशी एकात्मता पाहिली जाऊ शकते. अन्य कोणत्याही देशात असे उदाहरण नाही,’ असे देशाबद्दलचे गौरवोद्गार एका कार्यक्रमात न्या. कपाडिया यांनी काढले होते.
सरन्यायाधीश पद सांभाळत असताना न्या. कपाडिया यांनी देशातील न्यायसंस्थेमध्ये एकप्रकारची शिस्तबद्धता आणली. तसेच भ्रष्टाचाराला आळा बसवण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. राजकर्त्यांवर ते थेट टीका करत. या टीकेतून ममता बॅनर्जीही वाचल्या नव्हत्या. न्यायसंस्था प्रशासकीय कामात नको तेवढा हस्तक्षेप करत असल्याची नाराजी ममता बॅनर्जींनी जाहीर सभेत केली होती. त्याला प्रत्युत्तर देत न्या. कपाडिया यांनी प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे न्यायसंस्थेवर ही वेळ ओढवली आहे, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या एका कार्यक्रमात जाहीरपणे म्हटले होते.
कपाडिया यांनी आपल्या कारकिर्दीत ८३४ निकाल आणि आदेश दिले. त्यापैकी गाजलेला निकाल म्हणजे वोडाफोन इंटरनॅशनल होल्डींग विरुद्ध केंद्र सरकार. भारतीय टॅक्स आॅथॉरिटीला देशाबाहेर झालेल्या व्यवहारांवर कर लावण्याचा अधिकार नसल्याचा निकाल त्यांनी दिला. या निकालामुळे केंद्र
सरकारला जबरस्त धक्का
बसला होता. त्याशिवाय त्यांनी
लालु प्रसाद यादव यांचा जामीन
अर्ज फेटाळून राज्यकर्त्यांना आणखी एक धक्का दिला. तसेच २०११ मध्ये मुख्य दक्षता आयुक्त पी. जे. थॉमस यांची नियुक्ती रद्द करून आणखी
एक धक्का सरकारला दिला. (प्रतिनिधी)ते मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश असताना त्यांच्याशी संपर्क साधण्याची मला संधी मिळाली. माझी भेट अवघे एक तासाची. मी त्यावेळी हायकोर्टाचा रजिस्ट्रार आयटीमध्ये कामाला होतो. एका टॅक्सच्या मॅटरसाठी त्यांनी मला बोलवले होते. एका तासाच्या भेटीत ते शिस्तप्रिय असल्याचे मला समजले. त्याचबरोबर ते प्रेमळही होते. कोणतीही गोष्ट समजून घ्यायला वेळ लागयचा नाही.
- ए, आर. जोशी,
निवृत्त न्यायाधीश, उच्च न्यायालय
कपाडियांचे करिअर माझ्यासमोर घडले. ते माझ्यासमोर वकील म्हणून हजर राहयाचे. अत्यंत हुशार आणि अभ्यासू होते. त्यांनी अनेक महत्वाचे मॅटर अगदी नीट हाताळले आहेत.
- सुजाता मनोहर,
निवृत्त न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालय
मी एका महान व्यक्तीची पत्नी आहे, याचा मला अभिमान आहे. माझ्या आयुष्यातली मोठी व्यक्ती मी गमावली आहे. माझे पती शिस्तप्रिय होते. पण प्रेमळही होते. त्यांचा मला अभिमान आहे.
- शेरनाझ कपाडिया
कोणत्याही क्षेत्रात अव्वल ठरण्यासाठी संबंधित क्षेत्रातील ‘गॉडफादर’ आवश्यक असतो, हे विधान माजी सरन्यायाधीश कपाडीया यांनी खोडून काढले आणि अव्वल ठरण्यासाठी आत्मविश्वास असणे आवश्यक असते हे सिद्ध करुन दाखविले.
- इक्बाल छागला, ज्येष्ठ वकील माजी सरन्यायाधीश कपाडीया त्यांच्या शिस्तबद्ध आणि एकात्मताप्रिय कामगिरीसाठी सदैव लक्षात राहतील.
- अमित देसाई,
ज्येष्ठ वकील

Web Title: The important person in the legislature lost; Former Chief Justice Kapadia Kalvash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.