समांतर रस्त्यालगत बेकायदा टपऱ्या
By Admin | Updated: June 9, 2016 04:26 IST2016-06-09T04:26:23+5:302016-06-09T04:26:23+5:30
कल्याण-डोंबिवली समांतर रस्त्यालगत बेकायदा टपऱ्यांची मोठ्या प्रमाणावर बांधकामे झाली आहेत.

समांतर रस्त्यालगत बेकायदा टपऱ्या
कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरांना जोडणारा व जवळचा रस्ता असलेल्या कल्याण-डोंबिवली समांतर रस्त्यालगत बेकायदा टपऱ्यांची मोठ्या प्रमाणावर बांधकामे झाली आहेत. एकीकडे स्मार्ट सिटीचे स्वप्न बघितले जात असताना दुसरीकडे समांतर रस्त्यावर होत असलेल्या विद्रुपीकरणाकडे केडीएमसीचे पुरते दुर्लक्ष झाले आहे. तातडीने या टपऱ्यांवर कारवाई करा, अन्यथा महासभेत याबाबत आवाज उठवावा लागेल, असा इशारा शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक व माजी विरोधीपक्षनेते विश्वनाथ राणे यांनी प्रशासनाला दिला आहे.
कल्याण-डोंबिवलीत ये-जा करणारे सध्या समांतर रस्त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहेत. कल्याण-शीळ मार्गावरची वाहतूककोंडी, इंधनाचा होणारा अपव्यय पाहता केडीएमसीने काही वर्षांपूर्वी कल्याण-डोंबिवली समांतर रस्ता प्रस्तावित केला होता. या रस्त्याचे महापालिका हद्दीतील जवळपास ९५ टक्के काम पूर्णही झाले आहे. परंतु, रेल्वेच्या हद्दीतून सुमारे २०० मीटर जागेतून हा रस्ता जात असल्याने रेल्वे प्रशासनाच्या परवानगीची आवश्यकता होती.
यासंदर्भात रेल्वे प्रशासनाकडे प्रस्ताव पाठवला असता त्यांनी रस्त्याच्या बदल्यात २४ कोटी रुपयांची मागणी केडीएमसीकडे केली होती. त्यावर, केडीएमसीने कांचनगावातील जागा देण्याचा प्रस्ताव दिला. त्यामुळे रस्त्याचे काम रखडले होते. परंतु, महापालिकेने दिलेली जागा रेल्वेने नुकतीच स्वीकारल्याने समांतर रस्त्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, या महत्त्वाच्या रस्त्यालगत बेकायदा टपऱ्या उभारण्यात आल्या आहेत.
मटणविक्रीची दुकाने, पानटपऱ्या, वेल्डिंगची दुकाने मोठ्या प्रमाणात थाटण्यात आली आहेत. त्याकडे राणे यांनी लक्ष वेधले आहे. आतापर्यंत या रस्त्यावर ५० कोटी रुपये खर्च झाले आहेत. याच मार्गावर सेल्फी पॉइंट उभारण्यात आला आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही नुकतीच या मार्गाला भेट देऊन पाहणी केली होती. राष्ट्रीय रस्ते मानांकनाप्रमाणे या मार्गाच्या दोन्ही बाजूंना मिळून आठ फुटी पदपथ ठेवण्यात आला आहे. नागरिकांना याचा जॉगिंग ट्रॅक म्हणून वापर करण्याच्या अनुषंगाने कंत्राटदाराला वाढीव कामही देण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
>जुन्या रस्त्यावरही अतिक्रमणे कायम
समांतर रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात असताना लगतच्या टपऱ्यांकडे केडीएमसीचे होत असलेले दुर्लक्ष चुकीचे आहे. जुन्या रस्त्यांवरील फेरीवाल्यांची अतिक्रमणे हटवण्यात प्रशासन पुरते अपयशी ठरले आहे.
त्यात आता समांतर रस्त्यावरील टपऱ्यांची अतिक्रमणे न रोखल्यास नागरिक माफ करणार नाहीत, असे पत्र विश्वनाथ राणे यांनी आयुक्त ई. रवींद्रन व महापौर राजेंद्र देवळेकर यांना दिले आहे.