अवैध चाळी जमीनदोस्त
By Admin | Updated: May 30, 2016 02:44 IST2016-05-30T02:44:04+5:302016-05-30T02:44:04+5:30
अनधिकृत अशा साईसागर नागरी वसाहतीतील सुमारे सहाशे खोल्या शुक्रवारी तहसीलदार डॉ. स्नेहल कनिचे यांनी उद्ध्वस्त केल्या.

अवैध चाळी जमीनदोस्त
पालघर : माहीम ग्रामपंचायत क्षेत्रातील सर्व्हे नं. ९७४ क्षेत्रावरील २६ एकर आदिवासी जमीनीवर उभारलेल्या अनधिकृत अशा साईसागर नागरी वसाहतीतील सुमारे सहाशे खोल्या शुक्रवारी तहसीलदार डॉ. स्नेहल कनिचे यांनी उद्ध्वस्त केल्या.
आदिवासी भूखंडावरील अनधिकृत बांधकामे कोणतेही न्यायालय अथवा सरकार नियमीत करू शकत नाही असा निर्वाळा नुकताच उच्च न्यायालयाने दिला. त्यामुळे विरारच्या कारगील नगरासह, नालासोपारा येथील सुमारे ४९ बेकायदेशीर इमारतीवर हातोडा पडल्याने बेघर झालेले कुटुंबे पालघर तालुक्यातील माहिम, कळवा, आंबाडी देवखोप, सफाळे, बोईसर, पालघर इ. भागात बेकायदेशीररित्या उभारलेल्या आदिवासी जागांवरील बांधकामांचा आश्रय घेत आहेत. त्यामुळे पालघरमध्ये लवकरच दुसरे नालासोपारा, विरारसारख्या बेकायदेशीर वसाहती वसू लागल्या आहेत. कुठल्याही कागदपत्रांची शहनिश न करता अवघ्या शंभर रूपयाच्या स्टॅम्प पेपरवर अॅग्रीमेंट करून आपली आयुष्यभरची कमाई या बेकायदीशीर घरांमध्ये गुंतवली गेली असल्याने शेकडो कुटुंबे रस्त्यावर आली आहेत. माहीम ग्रामपंचायत राखीव भूखंड विक्री, बेकायदेशीर बांधकामे, बोगस घरपट्टया इ. कृत्यांमुळे तालुक्यात बदनाम झाली असून माजी सरपंच व ग्रामसेवकांच्या आशिर्वादमुळे माहीम ग्रा. पं. अंतर्गत सिडको औद्योगिक वसाहती मधील सर्व्हे नं. ९७४ या ९.१३ हेक्टर (सुमारे २६ एकर) क्षेत्रावर सागर भूतकडे व इतर तेरा मालकांनी संबंधीत विभागाच्या परवानग्या न घेता शासनाने उदरनिर्वाहसाठी दिलेल्या जमीनीवर रामशरण मिश्रा व रामअवध प्रजापती यांच्या सहाय्याने सुमारे ५०० ते ६००, १० बाय २० चौमी. ची बेकायदेशीर घरे व घराच्या जोत्याचे बांधकाम अनेक वर्षापूर्वी केले होते. ही जमीन नंतर धनंजय तिवारी रा. मुंबई यांना विक्री करण्यात आल्यानंतर या प्रकरणात झालेल्या भांडणा दरम्यान कस्तुरबा पो. स्टे. बोरीवली येथे गुन्ह्याची नोंद असल्याची माहिती पोलीसांनी दिली.
रामशरण मिश्रा हा आरपीएफ मध्ये पोलीस आहेत. त्यामुळे तक्रारी झाल्या तरी दीड वर्षापासून यावर कारवाई होत नव्हती. (वार्ताहर)