मुंबई: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दिवा आणि मुंब्रा स्थानकांदरम्यान दुर्दैवी अपघात घडला. यात अनेक प्रवाशांनी जीव गमावले तर काही प्रवासी जखमी झाले. परंतु, घटना नेमकी कशी घडली, हे कोडे रेल्वेला सुटत नसल्याने आता प्रशासनाने घटनेबद्दल नागरिकांना माहिती पाठविण्याचे आवाहन केले आहे. यासाठी त्यांनी नंबर तसेच इ-मेल जारी केला आहे.
मुंब्रा स्थानकाजवळ सोमवारी घडलेल्या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी मध्य रेल्वेने वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती नेमली आहे. ही दुर्घटना कशी घडली? प्रवाशांमध्ये काही भांडणे झाली होती का? दोन ट्रेनमधील प्रवासी वळणावर एकमेकांवर घासले गेले का? दरवाजात लटकलेल्याची बॅग घासून प्रवासी पडले का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न समिती करीत आहेत. परंतु, चौकशीमध्ये ठोस कारणे शोधण्यासाठी समितीला अडचणी येत असल्याने आता यामध्ये प्रत्यक्षदर्शी किंवा इतर प्रवाशांना तसेच कर्मचाऱ्यांना याबद्दल माहिती असल्यास प्रशासनाला कळवावे, असे आवाहन करण्यात आले.
काय केले आहे आवाहन?ज्या नागरिकांना किंवा प्रवाशांना मुंब्रा घटनेबद्दल आणि त्याच्याशी संबंधित बाबींबद्दल कोणतीही माहिती / तपशील असेल त्यांनी लवकरात लवकर चौकशी समितीसमोर हजर राहावे किंवा घटनेची माहिती ३ कामकाजाच्या दिवसांत कार्यालयात पाठवावी. ओळखपत्रासह ८८२८११९७३० या मोबाईल क्रमांकावर किंवा srdsobbcr@gmail.com या ई-मेलवर तपशील पाठवावा, असे सांगण्यात आले आहे.