शौचालय न वापरल्यास रेशन बंद!
By Admin | Updated: June 18, 2017 00:32 IST2017-06-18T00:32:24+5:302017-06-18T00:32:24+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियान योजनेस प्रोत्साहन म्हणून शौचालयाचा वापर न करणाऱ्या कुटुंबाला रेशन न देण्याचा निर्णय वळदगाव

शौचालय न वापरल्यास रेशन बंद!
लोकमत न्यूज नेटवर्क
बेलापूर (जि. अहमदनगर) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियान योजनेस प्रोत्साहन म्हणून शौचालयाचा वापर न करणाऱ्या कुटुंबाला रेशन न देण्याचा निर्णय वळदगाव (ता. श्रीरामपूर) ग्रामपंचायतीने घेतला आहे. त्याची १ जूनपासून अंमलबजावणी करण्यात आली आहे.
गावात एकूण ४३५ खातेदार असून, निकषपात्र कुटुंबाना शासनाचे प्रत्येकी १२ हजार रुपये अनुदान दिले आहे. त्यामुळे गाव १०० टक्के हागणदारीमुक्त झाले असून, केंद्रीय विशेष समितीने गावाला भेट देऊन पाहणी केली. लवकरच गावाची ‘हागणदारीमुक्त गाव’ म्हणून घोषणा केली जाणार आहे, अशी माहिती सरपंच बाबासाहेब शेटे यांनी दिली.
सर्व नागरिकांनी शौचालयाचा १०० टक्के वापर करणे अपेक्षित आहे. टाळाटाळ करणाऱ्या कुटुंबाना रेशन न देण्याचा ठराव ग्रामसभेने केला असून, त्याची अंमलबजावणी १ जूनपासून सुरू झाली आहे. या ठरावाची प्रत रेशन दुकानदारांना देण्यात आली आहे.