कर्जमुक्ती नाही तर मग आत्महत्या कशा थांबणार - उद्धव ठाकरे
By Admin | Updated: July 22, 2015 11:50 IST2015-07-22T09:41:09+5:302015-07-22T11:50:35+5:30
कर्जमाफीमुळे शेतक-यांच्या आत्महत्या थांबणार नसतील तर मग कशा थांबणार असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फडणवीस सरकारला विचारला आहे.
कर्जमुक्ती नाही तर मग आत्महत्या कशा थांबणार - उद्धव ठाकरे
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २२ - शेतक-यांना कर्जमाफी देण्याची मागणी फेटाळून लावण्याचा कणखरपणा मुख्यमंत्र्यांनी दाखवला असला तरी कणा मोडून बसलेल्या लाखो शेतक-यांचे जीवन ते कसे उभे करणार, शेतक-यांच्या आत्महत्या कशा थांबणार असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फडणवीस सरकारला विचारला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतक-यांच्या कर्जमाफी देण्याची मागणी फेटाळून लावली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयावरुन उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून फडणवीस सरकारला फटकारले आहे. शेतक-यांना संपूर्ण कर्जमुक्ती मिळावी ही आमची मागणी आहे, चोर- चिलटे, गुन्हेगारांना माफी दिली जाते, शेतकरी हा गुन्हेगार नाही तो राजा आहे, पण निसर्गाची अवकृपा व सरकारची चुकलेली धोरणे यामुळे तो भिकारी बनला आहे अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. राजकारणी, मंत्री व नोकरशहा यांचे उत्पन्न वाढते, सरकार व बँकांना डुबवणा-या उद्योगपतींना पुन्हा कर्ज मिळते, पण शेतकरी या सर्वात बसत नसल्याने तो उपाशी आहे असे त्यांनी म्हटले आहे. राज्यातला शेतकरी कधीच लुळापांगळा झाला असून तो कसाबसा कुबड्या घेऊन उभा राहण्याचा प्रयत्न सुरु आहेत हे मुख्यमंत्र्यांचे विधान मान्य केले तर त्याला स्वत:च्या पायावर उभे कसे करणार? कर्जमुक्तीच्या प्रश्नाने आत्महत्या थांबणार नसतील तर त्या कोणत्या उपायाने थांबतील? अशा प्रश्नांची सरबत्तीच त्यांनी फडणवीस सरकारवर केली आहे.