मी बोललो असतो, तर देश हादरला असता!
By Admin | Updated: June 30, 2016 04:18 IST2016-06-30T04:18:00+5:302016-06-30T04:18:00+5:30
आपल्यावर केलेले आरोप हा एका कटाचाच भाग असून, त्यावर बोललो असतो तर सारा देश हादरला असता

मी बोललो असतो, तर देश हादरला असता!
जळगाव : आपल्यावर केलेले आरोप हा एका कटाचाच भाग असून, त्यावर बोललो असतो तर सारा देश हादरला असता, असे सूचक आणि तितकेच गर्भित वक्तव्य करुन माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी बुधवारी भाजपा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत खळबळ उडून दिली. या बैठकीस अनुपस्थित असलेल्या जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनाही त्यांनी चिमटे काढले.
दाऊद इब्राहिमच्या कराचीस्थित घरातील दूरध्वनीवर झालेले कथित संभाषण व पुण्यातील भूखंड खरेदीमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडल्याने खडसे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. यानंतर प्रथमत:च घेतलेल्या भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत खडसे यांच्या वक्तव्याचे अनेक अर्थ काढले जात आहेत. खडसे म्हणाले, ४० वर्षांच्या कारकिर्दीत माझ्यावर एकही आरोप झाला नव्हता. मग आताच काय झाले?
मी हार मानत नसल्याने काहींनी ‘शिखंडी’ला पुढे केले. माझ्याविरोधात पुरावा दिल्यास राजकारण सोडतो असे आव्हान मी नेहमीच दिले. परंतु ही मंडळी एकही पुरावा देऊ शकलेली नाही. त्यामुळे हे ठरवून केलेले काम आहे, असा आरोप त्यांनी केला. (प्रतिनिधी)