आरोपींबाबात माझी काहीही तक्रार नाही
By Admin | Updated: January 8, 2017 00:47 IST2017-01-08T00:47:34+5:302017-01-08T00:47:34+5:30
महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील आरोपी व राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या मंत्रालयासमोरील बंगल्यावर काही शिवसैनिकांनी केलेल्या

आरोपींबाबात माझी काहीही तक्रार नाही
मुंबई : महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील आरोपी व राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या मंत्रालयासमोरील बंगल्यावर काही शिवसैनिकांनी केलेल्या हल्ल्याबाबत शनिवारी महानगर न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे साक्ष नोंदवली. या साक्षीत भुजबळांनी आरोपींना माफ करा. मला हे प्रकरण पुढे न्यायाचे नाही, असे दंडाधिकाऱ्यांना सांगितले. मात्र त्यांच्या या साक्षीमुळे खटल्यावर काहीही परिणाम होणार नसल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले.
भुजबळांनी साक्षीत ही घटना घडल्याचे मान्य केले. मात्र आरोपींना माफ करा, असेही भुजबळांनी दंडाधिकाऱ्यांना सांगितले. ‘बाळासाहेबांची प्रकृती खराब झाल्यानंतर मी त्यांच्याविरुद्ध आणि ‘सामना’ विरुद्ध केलेला बदनामीचा दावा मागे घेतला,’ अशी माहिती भुजबळ यांनी दंडाधिकाऱ्यांना दिली.
आरोपीच्या पिंजऱ्यात असलेल्या आरोपींनी भुजबळ यांनी ओळखले नाही. परंतु, गेले २० वर्षे हे आरोपी कोर्टाच्या चकरा मारत असल्याने त्यांना माफ करावे, असे भुजबळ यांनी म्हटले.
‘हल्ला झाला तेव्हा भुजबळ अन्य रुममध्ये होते. त्यामुळे त्यांनी आरोपीला ओळखणे शक्य नाही. भुजबळांनी त्यांच्या बंगल्यावर करण्यात आलेल्या हल्ल्याची घटना दंडाधिकाऱ्यांना सांगितली. तो बंगला त्यांचा असल्याने त्यांना साक्ष देण्यासाठी बोलवण्यात आले. या खटल्यामध्ये आणखी एक साक्षीदार आहे. त्याने या आरोपींना पाहिले आहे. त्यामुळे भुजबळांनी जरी आरोपींना माफ करा म्हटले असले तरी त्याचा या खटल्यावर काहीही परिणाम होणार नाही. कारण ही केस सरकार चालवत आहे,’ असे सरकारी वकील राजेंद्र सुर्यवंशूी यांनी सांगितले.
१९९६-९७ रमाबाई आंबडेकर कॉलनीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना केल्यानंतर मोठा सामाजिक तणाव निर्माण झाला होता. दंगल झाली होती. त्याला रोखण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला होता. (प्रतिनिधी)
युती आघाडीने केले होते आरोप-प्रत्यारोप
आंबेडकर कॉलनीत झालेल्या गोळीबारात १० जण मृत्यूमुखी पडले होते. या घटनेवरून सत्ताधारी युती आणि आघाडीने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. त्यावेळी छगन भुजबळ विरोधी पक्षनेते होते.
भुजबळ यांच्या सांगण्यावरूनच पुतळ्याची विटंबना करण्यात आली, असा आरोप केला गेला. सेनेच्या मुखपत्रातही हे वृत्त प्रसिद्ध झाले आणि त्याचवेळी भुजबळांच्या बंगल्यावरही हल्ला करण्यात आला.