छोट्या व्यावसायिकांवर उपासमारी
By Admin | Updated: August 3, 2016 02:40 IST2016-08-03T02:39:52+5:302016-08-03T02:40:39+5:30
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदपथावरील अतिक्रमणांच्या विरोधात धडक मोहीम सुरू केली आहे.

छोट्या व्यावसायिकांवर उपासमारी
कमलाकर कांबळे,
नवी मुंबई- महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदपथावरील अतिक्रमणांच्या विरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत वर्षानुवर्षे व्यवसाय करून आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. इतकेच नव्हे, तर राहत्या घरातच बाहेरच्या बाजूला छोटेखानी व्यवसाय करणाऱ्यांवरही गंडांतर आले आहे. त्यामुळे दैनंदिन विक्रीवर पोट असलेल्या शहरातील हजारो छोट्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
पदपथ आणि ठाण मांडून बसलेल्या फेरीवाल्यांवर कारवाई करून महापालिकेने पदपथ आणि रस्ते नागरिकांसाठी खुले केले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या या कारवाईचे शहरवासीयांकडून कौतुक होत आहे. फेरीवाल्यांबरोबरच बैठ्या घरांच्या तळमजल्यावर चालणाऱ्या पानाच्या टपऱ्या, वडापाव सेंटर, किराणा मालाचे दुकान, स्टेशनरी, भाजी विक्रेते आदी छोट्या व्यवसायांवरही निर्बंध घालण्यात आले आहेत. विशेष म्हणजे अनेकांनी उत्पन्नाचे स्रोत म्हणून आपल्या बैठ्या घरांचे वाढीव बांधकाम करून तळमजल्यावर व्यवसाय सुरू केले आहेत. त्यावरच अनेकांचे घर चालते. मुलांचे शिक्षण होत आहे. अशा परिस्थितीत महापालिका आयुक्तांनी निवासी गाळ्यात सुरू असलेले हे सर्व व्यवसाय बंद करण्याचे फर्मान सोडल्याने शेकडो लोकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
वाशी, कोपरखैरणे, तुर्भे, नेरूळ, घणसोली, ऐरोली या भागात अल्प उत्पन्न घटकांसाठी सिडकोने मोठ्याप्रमाणात बैठी घरे बांधली आहेत. गेल्या काही वर्षांत या बैठ्या घरांचे अनियोजितरीत्या वाढीव बांधकाम करण्यात आले आहे. तळमजल्याचा वापर छोटेखानी व्यवसायासाठी केला जात आहे. विशेष म्हणजे यापैकी कोणत्याही बांधकामांना भोगवटा प्रमाणपत्र नाही. तसेच निवासी जागेत विनापरवाना व्यवसाय करता येत नाही. ही वस्तुस्थिती असतानाही महापालिका प्रशासनाने मागील वीस वर्षे या प्रकाराकडे कानाडोळा केला. त्याचा परिणाम म्हणून शहरात उपर मकान, निचे दुकान ही प्रवृत्ती बळावली. निवासी जागेत व्यवसाय करण्यासाठी परवानगी घ्यावी लागते, ही बाबच शहरवासीयांच्या विस्मृतीतून गेली. परंतु उशिरा का होईना, महापालिकेला नियमांची जाणीव झाली आहे. आयुक्तपदाची धुरा स्वीकारताच तुकाराम मुंढे यांनी सर्वप्रथम वर्षानुवर्षे चालणाऱ्या या नियमबाह्य गोष्टींना लगाम घालण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार पदपथावरील फेरीवाल्यांसह निवासी जागेत व्यवसाय करणाऱ्यांना नोटिसा बजावून व्यवसाय बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. व्यवसाय करायचा असेल तर सर्वप्रथम जागेचा चेंज आॅफ युज करून घेण्याच्या सूचना संबंधितांना करण्यात आल्या आहेत.
>महापालिकेच्या या भूमिकेमुळे वर्षानुवर्षे निवासी जागेत छोटेखानी व्यवसाय करून आपला परिवार चालविणाऱ्या शेकडो मध्यमवर्गीयांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे महापालिकेने यासंदर्भात निश्चित धोरण तयार करून दिलासा द्यावा, अशी मागणी या व्यावसायिकांकडून होत आहे.