दीडशे गावांचा संपर्क तुटला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2016 04:39 IST2016-07-10T04:39:30+5:302016-07-10T04:39:30+5:30
दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे विदर्भाच्या अनेक जिल्ह्यांत पूरसदृश्य स्थिती आहे. भामरागड तालुक्यात पर्लकोटा नदी व एटापल्ली तालुक्यात आलदंडी

दीडशे गावांचा संपर्क तुटला!
अमरावती/गडचिरोली : दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे विदर्भाच्या अनेक जिल्ह्यांत पूरसदृश्य स्थिती आहे. भामरागड तालुक्यात पर्लकोटा नदी व एटापल्ली तालुक्यात आलदंडी नदीवरील पूल पाण्याखाली आल्याने १५० गावांचा संपर्क तुटला आहे.
भामरागडजवळ असलेल्या पर्लकोटा नदीवरील पुलाची उंची कमी आहे. शुक्रवारपासून सुरू असलेल्या पावसामुळे नदीच्या पाण्याची पातळी वाढली. शनिवारी दुपारच्या सुमारास या पुलावर दोन ते अडीच फूट पाणी होते. त्यामुळे भामरागडसह जवळपास १०० गावांचा संपर्क तुटला आहे. अहेरीजवळच्या गडअहेरी नाल्यावरही अत्यंत कमी उंचीचा पूल आहे. या पुलावरून पाणी वाहत असल्याने तालुक्यातील देवलमरी, कोत्तागुडम, पुसूकपल्ली, संड्रा, चेरपल्ली, आवलमरी, व्यंकटरावपेठा, इंदाराम, आकनपल्ली, काटेपल्ली, कोलपल्ली, कर्नेली, लंकाचेन, वट्रा, चिन्नावट्रा, पेदावट्रा आदी २० गावांचा संपर्क तुटला आहे. एटापल्ली तालुक्यातील आलदंडी नदी पुलावरून ७ ते ८ फूट पाणी वाहत असल्याने सुरजागड परिसरातील ७० गावांचा संपर्क तुटला आहे. चंद्रपूरच्या कोरपना-परसोडा, नागभीड-जनकापूर, मोहाडी-वासेरा, तळोधी-गांगलवाडी या मार्गांवरील पुलांवर पाणी असल्याने बंद आहेत. सावली तालुक्यात पाच मार्ग बंद आहेत. भंडारा जिल्ह्यात तुमसर, साकोली व लाखनी या तीन तालुक्यांत अतिवृष्टी झाली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
१२ तालुक्यांमध्ये अतिवृष्टी
यवतमाळ जिल्ह्यातील सायखेडा मध्यम प्रकल्प व रूई लघू प्रकल्प अतिवष्टीमुळे ओव्हर फ्लो झाला आहे. यवतमाळला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा जलाशयाच्या साठ्यात मोठी वाढ झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यात ९ तर अमरावती जिल्ह्यात ३ तालुक्यांत अतिवृष्टी झाली आहे. मागील २४ तासांत सर्वाधिक ७२.८ मि.मी. पाऊस यवतमाळ जिल्ह्यात पडला. याशिवाय अमरावती ५८.६, अकोला १७.५, बुलडाणा ५.८, वाशीम जिल्ह्यात २३.६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
शेती पाण्यात, वाहतूक खोळंबली
अमरावती विभागातील बुलडाणा वगळता अन्य चार जिल्ह्यांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. अमरावती जिल्ह्यातील धामनगाव आणि चांदूर रेल्वे तालुक्यात अतिवृष्टीमुळे किमान २ हजार हेक्टर शेती पाण्याखाली आली आहे. शुक्रवारी रात्री वर्धा नदीला पूर आल्याने मध्य प्रदेशात जाणारी वाहतूक ४ तास खोळंबली होती.